Tuesday, 17 December 2024

कुल्फी अंकातील रहस्य.

 बबिताने चोरी केली का?

'कुल्फी' हा आमच्या मुलांचा आवडीचा अंक. या अंकाची मुले वाट पाहत असतात. बालकट्टा सेंटरला मुलांना कुल्फी अंक हातात ठेवला, तेव्हा त्या पुस्तकाची अनुक्रमानिका तपासून त्यात काय-काय आहे हे चाळून पाहिले. या अंकात त्यांना सर्वात जास्त आवडलेली गोष्ट ती म्हणजे, 'बबिताने चोरी केली का? 

या गोष्टीची खास बात ती म्हणजे यात लपून असलेलं रहस्य. अनु आणि बबीता या मुलींची गोष्ट. 
सांराश रूप:- अनु हि पुण्यात नौकरी करत असते. काही दिवसांनी बबिता रूम मेट म्हणून तिचाकडे राहायला येते. आणि ती नौकरीच्या सुद्धा शोधात असते. अनुला गावाला जायचे असते. याचवेळी बबिता सुद्धा मुंबईला जाऊन येते. अनु परत आल्यावर तिला कळतं कि, तिचे दागिने आणि कपाटातील काही पैसे चोरीला गेलेत. अनु बबीतावर तिनेच चोरी केली असा आरोप करते. पण बबिता सुद्धा रूमवर नव्हती आणि ती याच दिवसामध्ये मुंबईला गेलेली असे सांगून अनुला पुरावा म्हणून सगळी बिलं आणि तिकिटे दाखवते. यावर बबिताने चोरी केली असेल का? केली तर कशी? आणि केली नसेल तर कसे? यावर मुलांनी गटचर्चा करून खूपच भन्नाट शक्कले लढवली. 

रहस्यचा उतारा वाचल्यानंतर मुलांनी सऱ्हास बबितानेच चोरी केली असावी. असा निर्णय देवून मोकळी झाली. मग एकाने कसं काय? हा प्रश्न विचारला. तेव्हा मुलांनी अजून खोलात जाऊन विचार करायला सुरुवात केली. 
प्रथम त्यांनी सगळे पुरावे तपासले. जाण्या येण्याच्या प्रवासाची तिकिटे. मुंबई मधील हॉटेलचे जेवण, म्युझियम  आणि सिनेमाचे  तिकीट, व्हाट्सअप वरील पुरावा.
हे करत असतांना मुले खरीखुरी डिटेक्टीव्ह प्रमाणे वही पेन घेवून नोंद करत होती. सगळ्या तिकीटांवरील तारखा आणि वेळ याचे त्यांनी वर्गीकरण केले. कुठल्यावेळी काय घडले याचीही नोंद घेतली.
आरोपीने प्रथम काय केले असू शकते याचा अंदाज सगळे बंधू लागले होते. मुलांनी प्रथम प्रवासावरती चर्चा केली. प्रवासाची तारीख, वेळ आणि ठिकाण यावरती चर्चा झाल्या. किती वाजता ती घरातून बाहेत पडली आणि कधी परत आली नंतर काय केले यावर भर दिला. स्त्री-२ हा मुव्ही बघितला. नंतर तिने वडा सांबर आणि इडली खाल्ली ते हि चार प्लेट. टी-शर्ट सुद्धा घेतला. 

पण मग तिनेच चोरी केली कशावरून? मुलांनी mobile च्या व्हाट्सअप चित्राचा पुरावा बघितला त्यात मुलांनी अंदाज बांधला कि, तिने मुंबईला जाण्या अगोदर रात्री १२ वाजता भावंडाच्या ग्रुपवर मुंबईला मज्जा करण्याचा मसेंज पाठवला आणि सोन्याचे कानातले असल्याचा फोटो सुद्धा टाकला. यावर मुलांची कुजबुज सुरु झाली. आणि एका पॅाइंटला येवून मोठा संशयास्पद निर्णय मांडला.
कि, ती पुण्याला नौकरीच्या शोधात आलेली. तिचाकडे नौकरी नव्हती, म्हणजेच तिचाकडे पैसे पण नसणार. मग तिने सोने खरेदी करण्यासाठी पैसे कुठून आलेत?  पुणेहून मुंबई आणि मुंबईहून परत पुणे  तिकिटाला ऐवढे पैसे कुठून आलेत? मुंबई मध्ये मुव्ही पाहिला त्या तिकिटावर पैसे लिहून नव्हते. पण साधारण त्याला १००० रुपये तरी नक्कीच गेले असतील. असा अंदाजा मुलांनी बांधला.  हॉटेल मध्ये चार प्लेट नास्ता केला म्हणजेच तिने सगळ्या भावांचा खर्च केला आणि कपडे पण खरेदी केलेत. एव्हढ सगळ करायला पैसे लागतात. त्यामुळे बबितानेच चोरी केली. असे सगळ्यांचे मत पडले. 
 
तिचाकडे आधी पण पैसे असतील ना असे म्हणून एकाने प्रश्न टाकला. हो असू शकतात ना पण तसे पुस्तकात नाही लिहिले मग कस ठरवणार. एक मुलगा म्हणाला कि, बबिताने पुरावा देवून स्वतालाच धोक्यात घालून घेतले. चोर कधीच चोरीचा पुरावा देत नसतो. आम्ही पिच्चर मध्ये पाहिलय. 
एकाने म्हटले कि, मुंबई ला जाऊन तिने फक्त मज्जाच केली. तिचाकडे जॉब नव्हता तर पैसे पण नसेलच त्यामुळे घरातील लोकांना वाटावं कि तीच चांगल सुरु आहे. तीला जॉब मिळाला म्हणून ती खोटं खोटं दाखवत असेल. जे आहे ते खर सांगाव खोटं कशाला दाखवायचं? तिने प्रयत्न केला असता तर नौकरी मिळाली असती.

वरील मुलांच्या चर्चेतून हे लक्षात आलेतच असेल कि, मुलांना आपल्या आजूबाजूला काय चाललंय यावर लक्ष असतं. त्या गोष्टीला धरून संवेदनशील सुद्धा असतात. पण पडत असलेल्या प्रश्नांना योग्य तो मार्ग दाखवणारी व्यक्ती त्याच्या सोबत नसते. यातलं नेमकं काय बरोबर आणि काय चूक हे कधी कोणी सांगितेलेच नसते. आजूबाजूला घडत असलेल्या गोष्टींशी आपला काही एक संबध नाही. असे म्हणून पालक सुद्धा त्या विषयापासून मुलांना लांब करतात. अगदी छोट्या छोट्या गोष्टीचे निरीक्षण करून त्यातील नैतिकता यावर चर्चा केली तर मुलांना प्रश्नांची उत्तरे मिळत जातील. बबिताने चोरी केली? कि नाही हे मुलांना महत्वाचे राहिले नाही त्यांनी चोरी करणे वाईट आहे. घरच्यांना खोटे सांगणे हे वाईट आहे. आपण प्रयत्न करायला हवे. आता अनु कधीच तिच्यावर  विश्वास टाकणार नाही. अनु तिला  कधीच मैत्रीण बनवणार नाही. इतका मोठा विचार आणि खरी मज्जा मुलांना या कुल्फीच्या रहस्य कथेमुळे मिळाला  .

सेंटर ला भेट दिलेल्या पोलिसांनी सुद्धा चर्चा ऐकल्यानंतर मुलांचे खूप कौतुक केले आणि शाब्बासकी दिली.




Friday, 5 January 2024

शिकण्यातील आनंद

आपल्या वयाची काही वर्षे लोटून गेली की, जुन्या आठवणी आपल्याला आठवायला लागतात. अगदीच काही वर्षाच्या आतील असेल तर, त्या अगदी स्पष्ट आठवतात. पण जर फार वर्षापूर्वीच्या जुन्या किंवा बालपणाच्या असतील तर त्या पुसटश्या स्वरुपात आठवतात. पण आपण नीट निरखून पाहिलं तर सगळ्याच गोष्टी आपल्याला लक्षात राहिलेल्या नसतात. लक्षात असतात त्या फक्त घटना. आणि ह्याच घटना म्हणजेच त्यावेळी माणसाने घेतलेला अनुभव.

त्यावेळी काहीतरी ठोस असं झालेलं असेल म्हणून तो क्षण आपल्या मेंदूत कायमचा टिपून राहिला असेल. यात अनुभवाची यादी हि व्यक्ती परत्वे नक्कीच वेगवेगळी असू शकते. परंतु आपण सगळ्या घटनांची गोळा बेरीज केली की, तर आपल्याला असे लक्षात येईल की, ही सगळी यादी मजा, मस्तीची जास्त प्रमाणात आहेत. जसे एकत्र खाल्लेला डब्बा, मित्र मैत्रिणींसोबत घालवलेला प्रत्येक क्षण, सहलीत, शाळेत, कार्यक्रमात केलाला दंगा – खोड्या, सरांनी दिलेला मार, लागलेला चटका, आई-बाबाने दिलेला मार, आजीने सांगितलेल्या गोष्टी, केलेले लाड, त्यावेळी मिळालेल्या भेटवस्तू, प्रवासातील प्रतेक क्षण, जंगलातील मज्जा किंवा खेळलेलो खेळ, इत्यादी इत्यादी. सगळं कसं अगदी ताज असल्यासारखं वाटतं. नाही का? पण हेच का बरं लक्षात राहिलं असेल? अभ्यास का लक्षात राहिला नसेल? शिक्षकांनी तर शिकवला होता ना? मग तो कुठे हरवला?

पाठ्यपुस्तक हे मज्जा म्हणून न शिकवता परीक्षेत येणाऱ्या उत्तरांसाठीची तयारी म्हणून राहिलं. पाठ करणं आणि घोकंपट्टी करणं त्यात इतकच होतं. त्यामुळे उत्तरं आले तर शाबासकी, नाही आले तर छडी. वर्षाखेर अभ्यासक्रम पूर्ण व्हायला हवा या भीतीपोटी मुलांवर झालेल्या कळत-नकळत शिक्षेमुळे त्यांना अभ्यास मित्र न वाटता शत्रू वाटतो.

आमचे आजी आजोबा तिसरी, चौथी इतकेच शिकेलेले होते. पण ते आम्हाला त्यांच्या वर्गातील जुन्या कविता, गाणी म्हणून दाखवायचे अगदी वयाच्या  ऐंशीव्या वर्षी. इतकी वर्षे त्यांच्या शिक्षणाला होऊन सुद्धा ते का बरं विसरले नाहीत?

मुलांनी शाळेत यावं, शिक्षक शिकवतील ते शिकावं. अगदी निमुटपणे. किमान लिहिता वाचता यावं. या व्यतिरिक्त मुलांमध्ये शिकण्याची ओढ आणि स्वत:हून वेगेळे कौशल्य असेल तर त्यावर भर देवून त्यालाच पुढे घेवून जाता येईल अशा पद्धतीची व्यवस्थाप्रणाली जर इथे कार्य करत नसेल ना, हे आपल्याला तपासून बघायला हवं. मग नेमकं हल्लीच्या शिक्षणातून काय हरवलंय?

हरवला तो म्हणजे शिकण्यातील आनंद.

कारण, जेव्हा शिकण्यात आनंद वाटायला लागतो तेव्हा तो माणसाच्या स्मरणात कायमच घर करून बसतो. आपल्या रोजच्या जगण्यामध्ये लागणाऱ्या कौशल्याचे शिक्षण, प्रत्येक गोष्ट कशी करून पहायची?  त्यात काय विज्ञान दडलंय हे जाणून घेण्याचे शिक्षण, गटागटात कसे काम करायचे असते या मूल्यांचे शिक्षण, एकमेकांशी हितसंबध कसे जपायचे, कशा भावना जपायच्या या आदर भावाचे शिक्षण, स्त्री पुरुष भेदाभेद यावर उघड चर्चा करून समतेच्या पातळीवरील शिक्षण, जात, धर्म प्रांत, लिंग, रंग, व्यंग, भाषा,  गरीब - श्रीमंत या भेदाच्या पलीकडील माणूस बनण्यासाठीचे शिक्षण आणि मुख्य म्हणजे एखाद्या बालकाला लहान मूल न समजता त्याला आजचा वर्तमान आणि  भविष्यात तयार होणारा नागरिक म्हणून या सगळ्या बाबींचा अनुभव देणारं शिक्षण.

कुण्या एका थोर माणसाने म्हटलेलंच आहे कि, फक्त लिहिता वाचता येणे म्हणजे शिक्षण नव्हे तर बुद्धीला सत्याकडे, भावनेला माणुसकीकडे आणि शरीराला श्रमाकडे नेण्याचा मार्ग...म्हणजे शिक्षण.

ते लहान आहे. त्याला अजून काय कळतं? हे वाक्यप्रचार आपल्याला थांबवावे लागणार. कारण आपल्याला लक्षात घ्यायला हव कि, मूल लहान असले तरीसुद्धा त्याच्या मार्यादानुसार मुलांना उमगतं आणि समजतं असत. मुलं तुमचं, आमचं, सगळ्यांच निरीक्षण करत असतात. त्यांना हे सुद्धा माहित असत की, आपण लहान आहोत आणि आपल्या छोट्या हातांनी व उंचीने काहीच, शरीरातील बळाने आपल्याला काहीच करता येणार नाही. परंतु ते ते आपल्या आजूबाजूचे अनुभव घेवूनच मोठ होत जात आणि हे सगळे अनुभव घेवून जेव्हा मोठा होतील. वाईट सांगत मिळाली असेल तर तेव्हा मात्र मोठ्या मंडळींनो आपल्या हातून वेळ निघून गेलेली असेल.

चीन या देशात प्रत्येक नागरिक एकमेकांचा वाकून आदराने नमस्कार करतात. आपल्या मुलांनाही ते इतरांप्रती आदर कसा व्यक्त करायचा करायचा ते शिकवतात. त्यांची हि शिकवण कुटुंबांपुरतीच मर्यादित न ठेवता तो त्यांच्या जगण्याचा भाग बनवून घेतलाय. त्यामुळे आपल्याला प्रत्येक मुलाला एक सुजाण नगरीक घडवायचे असेल तर आपल्या जगण्यामध्ये मुल्यांची अत्यंत गरज आहे. आपल्या मुलांना प्रत्येक गोष्टीचे कार्यकारण भाव समजावून सांगणे. त्याला पडलेल्या प्रत्येक प्रश्नांचे उत्तर देणे. आपल्याला माहित नसेल तर शोधून सांगणे. चूक बरोबर या नाण्यांच्या दोन्ही बाजू लक्षात आणून देणे. त्याला वेगवेगळ्या चांगल्या गोष्टीचा अनुभव घेवू देण्याची संधी प्रदान करणे गरजचे वाटते. या सुवर्ण स्वप्नाकारीता आपल्याला बालकेंद्री होणे गरजेचे आहे. सामाजीकरनातील प्रत्येक घटकामध्ये बालकेंद्री वातारणाची निर्मिती करायला हवी. समाजातील प्रत्येक नागरिकामध्ये आणि शिक्षणामध्ये आनंद व माणुसकीनेचे बीज रोवली तर पुढील पिढी हि अधिक समृद्ध होऊ शकेल.

 

धम्मानंद...

(संचालक) ओवी ट्रस्ट


Monday, 27 November 2023

पुस्तकांचा दवाखाना !


'पुस्तकं' हा बालनगरी चा अविभाज्य घटक आहे. कारण, आता पुस्तकं मुलांचे सोबती झालेत. बालनगरीत असा एकही दिवस नाही ज्यादिवशी मुलं पुस्तकं वाचत नाहीत किंवा सहज हाताळत नाहीत. येथील ताई – दादा मुलांना दररोज पुस्तकं वाचून दाखवतात. सहभागी वाचन, प्रकट वाचन या नित्यनियमित कार्यक्रमामुळे मुले आता वाचक होऊ लागली आहेत. या कृतीमुळे मुलांचं पुस्तकं वाचणं, त्याची नोंद ठेवणं, पुस्तकातील काय आवडलं, नाही आवडलं किंवा का आवडलं? यावर चर्चा करणं, आपली मते मांडणं, पुस्तकातील कथेचं नाट्य सादरीकरण करणं, पुस्तकातील चित्रे हुबेहूब काढून बघणं त्याचबरोबर ज्याप्रमाणे एखाद्या सिनेमाघरा बाहेर सिनेमाचे पोस्टर लावलेलं असतं त्याप्रमाणे गोष्टीच्या पुस्तकाचं आकर्षक पोस्टर तयार करणं, जेणेकरून इतरांना ते वाचण्यासाठी प्रेरणा मिळेल. अशा अनेकानेक गोष्टी ‘पुस्तक’ या एका घटकाभोवती बालनगरीमध्ये मुले करून पाहत असतात. 

पुस्तकातील पात्र, लेखक, चित्रकार, प्रकाशक हे मुलांसाठी महत्वाचे झालेत. आम्हाला सांगायला आवडेल कि, माधुरी पुरंदरे  ह्या आमच्या मुलांच्या सर्वात आवडीच्या आणि लाडक्या लेखिका. त्यांची पुस्तके वाचतांना मुलं पुस्तकमयी जगात एकदम हरवून जातात. म्हणूनच या डिजीटल युगात सुद्धा पुस्तकं आमच्या  मुलांचे लाडके मित्र झालेत. 

तुम्हाला माहिती आहे का? आमच्या सेंटर मध्ये  ‘पुस्तकांचा दवाखाना’ आहे. विश्वास बसला नाही ना! अहो ज्या प्रमाणे माणसे आजारी पडली तर ते कसे दवाखान्यात जातात. औषधं घेतात आणि बरे होतात त्याप्रमाणे पुस्तकं सुद्धा आजारी पडतात, फाटतात, जीर्ण होतात, त्याचा कणा मोडतो इत्यादी. मग जेव्हा ती आजारी पडतात तेव्हा आम्हीच त्यांचे डॉक्टर होतो. कारण ते आता आमचे मित्र आहेत ना! कालपासून मुलं आणि ताई दादा मिळून पुस्तकांना कव्हर घालून त्यांना ताजे करण्याचे काम बालनगरी मधे नुकतेच सुरू झाले आहे. आपण मुलांसोबत काम करत असाल. तुमच्या मुलांना पुस्तके वाचायला खूप आवडत असेल त्यांनी हा दवाखाना नक्की तयार करावा. त्यातून मुलांना पुस्तकाबद्दल प्रेम, काळजी, जवळीकता निर्माण होईल जी त्यांना आयुष्यभर उपयोगी येऊ शकते.  आणि पुस्तकासाठीचा दवाखाना हि संकल्पना कशी वाटली ते आम्हला प्रतिक्रिया च्या माध्यमातून नाकी कळवा!

#बालनगरी #ओवी_ट्रस्ट#धनगरवाडी #यवतमाळ

www. oveetrust.org 

Saturday, 16 September 2023

'बालनगरीतील निवडणुक'

लोकशाही हा आपल्या देशाचा कणा आहे.  निवडणूक, मतदान ही आपल्या लोकशाहीची मूलभूत आणि अत्यंत महत्वाची प्रक्रिया आहे. वयाच्या अठरा वर्षानंतर आपण देशातील मतदानामध्ये आपली भूमिका बजावत असतो. तोपर्यंत निवडणुकीबदल थोरामोठ्यांकडून वेगवगळ्या पद्धतीच्या गोष्टी ऐकत असतो. मुल सज्ञान होईपर्यंत त्याच्या त्याच्या धारणा ह्या बनलेल्या असतात.परंतु या प्रक्रियेत नेमक चूक आणि बरोबर अशा मूल्यांबाबत सांगणार कुणीही नसतं. मग मुल या वातावरणात आणि व्यक्ती निरीक्षणावरून मुलाची समज हळूहळू दृढ होत जाते पण हि झालेली समज योग्य कि अयोग्य यावर त्यांना सांगण्यास कुणीही नसत. एखादी निवडणूक प्रक्रिया कशी असते? मतदान केल्याने आणि न केल्याने काय होते? निवडणूक आयोगाची कोणती कामे असतात? निवडून येणाऱ्या प्रतिनिधींची कर्तव्ये आणि जबाबदाऱ्या काय असतात? आणि एक सुजाण नागरिक म्हणून या सबंध प्रक्रियेत एक नागरिक म्हणून आपली भूमिका काय? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे जेव्हा मुलं स्वतः अनुभवातून घेतात तेव्हा त्यांच्या आकलन कक्षा आणि शिकण्यातला आनंद हा द्विगुणीत आणि अधिक समृध्द करण्यास प्रेरणा मिळत जाते. आम्ही अशा उपक्रमातून मुलांना या प्रक्रियेचा अनुभव देवून त्यावर सुयोग्य चर्चा करून मुलांची समज विकसित करण्याचा प्रयत्न करू पाहतोय.
आपल्या शिक्षणाचा आपल्या जगण्याची संबंध असायला हवा अस आम्हाला नेहमी वाटत, जीवन जगत असतांना ज्या-ज्या गोष्टीची गरज भासते. किमान त्याचा पूर्वअनुभव मुलांच्या पाठीशी असणे आणि त्यातील वैज्ञानिक कारण माहिती असणे हे अत्यंत गरजेचे आहे. आनंदाने,कृतीतून आणि अनुभवातून शिकणं हे बालनगरीचं मुख्य तत्व आहे. याचाच एक भाग म्हणून नुकतीच पार पडलेली 'बालनगरीतील निवडणुक'. यात सर्व मुलांनी हिरहिरीने सहभाग घेतला. यातून आलेला हा छोटासा अनुभव, निरीक्षण आणि पार पडलेली प्रक्रिया आपल्यासोबत शेअर करायला आम्हाला आनंद होत आहे. 

निवडणुकीतील पहिला आणि दुसरा टप्पा : या टप्यामध्ये साधारणता मुलांना निवडणूक आयोग, मतदान, कर्तव्य आणि जबाबदारी या संदर्भातील प्रश्न देवून त्याची उत्तरे आपल्याच गावातील मंडळीकडून मिळवायला सांगितली, त्यानंतर पुस्तकातून आणि गरज भासल्यास इंटरनेट मोबाईलवर शोधून माहिती संकलित करणे आणि संकलित झालेल्या माहितीला कार्डशीटवर लिहून बालनगरीतील मुलांसमोर सादरीकरण करणे अश्या पद्धतीचे काम नेमून दिले. यात मुलांनी गावातील सरपंच आणि इतर मान्यवर गावकरी यांचेकडून माहिती घेण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर काही नागरिक शास्त्राची पुस्तके चाळली. सोबतच मोबाईलचा वापर करून माहिती गोळा केली. 
गोळा झालेली माहिती ही योग्य आहे की नाही याची चाचपडताळणी सुद्धा करून घेतली. त्यानंतर या माहितीला गटात बसून कार्डशीट वर लिहून काढण्यात आले व दुसऱ्या टप्यात त्याचे सादरीकरण केले. या सादरीकरण मध्ये मुलांनी अतिशय महत्वाचे मुद्दे मांडलेत कि, प्रत्येकाने मतदान करायलाच हवे. आपले मत खूप महत्वपूर्ण आहेत. कारण, मतदान न केल्यास चुकीचा व्यक्ती निवडून येण्याची शक्यता जास्त असते. मत नाही दिले तर आपल्याला प्रश्न विचारण्याचा अधिकार उरत नाही. 

यानंतर मतदानावर
 'माईड मॅपच्या' माध्यमातून चर्चा करण्यात आली. यात शब्दांचे अर्थ आणि प्रक्रियेवर अनुभव शेअर करण्यात आले. यात विशेष म्हणजे निवडणुकीत होणाऱ्या नैतिकतेवर मुलांनी प्रश्न विचारले. जसे कि, निवडणुकीत
लोक पैसे वाटतात, लाच देतात, पार्टी करतात. लोकांना दारू पाजतात? हे चुकीचे आहे ना? असे न करता मतदान होऊ शकते का? कारण यातून आपण स्वतःला विकत असतो आणि मग आपली गावातील विकासाची कामे होत नाही. आपल्याला विचारायला जागा उरत नाही. अशा प्रश्नोत्तराच्या चर्चेतून मुलांनी मोठ्यासांरखी समज दाखवली. एक प्रकारे मुलांना चुकतंय काय ते कळलं पण समाजामध्ये तसे घडतांना दिसत नाही. हा त्यांचा समाजातील लोकांवरतीचा रोश होता.

टप्पा तिसरा आणि चौथा : या टप्यामध्ये ज्या मुलांना निवडणुकीत उमेदवार म्हणून आपला सहभाग घ्यायचा होता
त्यांनी 'बालनगरी निवडणूक आयोगाकडे' आपले अर्ज सादर केले गेले. सोबतच निवडून आल्यानंतर ते कोणते कार्य करणार याची यादी देखील अर्जात त्यांनी नोंद केलेली. यांनतर अर्जाची छाननी करून दहा 
मुलांचे अर्ज मान्य करण्यात आले. मान्य केलेल्या अर्जावर अर्जदारांची मिटिंग करण्यात आली. यात ज्या अर्जदारांचा अर्ज स्वीकारण्यात आलेला नाही. त्यावर चर्चा करून कारणे सांगण्यात आले आणि उर्वरित दहा उमेदवारांची जाहीर सभा घेवून. प्रत्येक उमेदवाराला 'तुम्ही बालनगरीचा सरपंच, उपसरपंच म्हणून
निवडून आलात तर
 कोणती कामे करणार?' यावर प्रत्येकांना आपले मत मांडण्यासाठीची संधी देण्यात आली.काहींनी वर्गातील मुलांना वेळेवर यायला सांगणार, त्यांना नीट बसवणार, अंघोळ करायला, केस विंचरून यायला लावणार, लहान मुलांची काळजी घेणार, बालनगरीची स्वच्छता करणार, जास्तीत जास्त मुले शाळा आणि बालनगरीत यावी यासाठी प्रयत्न करणार हे
सांगितले. हा अनुभव मुलांसाठी आणि आमच्यासाठी अत्यंत सुखद होता. कारण यात असे दिसले कि, प्रत्येक मुलांनी शाळेत जायला हवे यासाठीचा विचार मुलांमध्ये रुजलेला दिसला. भूमिका मांडतांना बालनगरी बद्दलची Ownership  जाणवली सोबतच मुलांनी आपली मते मांडणे हे महत्वाचे होते. यानंतर बैठक  घेवून चिन्हांचे वाटप करण्यात आले आणि प्रचारासाठी पत्रके देवून एका आठवड्याभरात निवडणुकीची तारीख ठरवण्यात आली. यात काही मुलांनी आपण प्रचार कसा करणार आहोत या बद्दलच्या रणनीती ठरवल्या. काहींनी जी मुले बेड्यावर जातात त्यांच्या नातेवाईकांना पटवून त्यांना बालनगरी मध्ये आनण्याचा प्रयत्न करू. मुलींना घरकामात मदत करून त्यांना लवकर बालनगरीमध्ये येण्यास हातभार लावू. मुलांनी गावामध्ये पोस्टर लावून प्रचार-प्रसार करण्यात आला.

टप्पा पाचवा :  एक आठवड्यानंतर निवडणुकीचा दिवस उजाडला.. मुलांना मतदान केंद्रा सारखे वाटावे याकरिता खोल्यांमध्ये फलक आणि टेबल लावण्यात आले. ठरल्याप्रमाणे सर्व उमेदवारांनी जास्तीत जास्त मुलांना मतदान करण्यासाठी बालनगरीच्या मतदान केंद्रात आणले गेले. सर्वांना नीट बसवून मतदान गुप्त पद्धतीने कसे करायचे? याची माहिती देण्यात आली. प्रथम नोंदणी करून, बोटाला शाई लावून आणि मग बॅलेट पेपर वर शिक्का मारून ते मतपेटीत टाकणे. अशी ती प्रक्रिया असणार आहे हे सांगण्यात आले. त्यांतर हि प्रक्रिया मुलांनी मोठ्या उत्साहाने पूर्ण केली. एकीकडे कोण निवडून येणार याची कुजबुज सुरु होती. तर दुसरीकडे काही उमेदवारांच्या मनात धाकधूक होती. एकूण ११० मुलांपैकी ९२ मुलांनी आपला मताधिकार बजावला.
त्यानंतर गावातील सरपंच व गावातील इतर मोठी मंडळी यांनी मतमोजणी करण्यास आनंदाने योगदान दिले आणि मत मोजणीनंतर सगळ्यांसमोर निकाल जाहीर करण्यात आला. ५१ मते घेऊन दीपक सरपंच पदावर तर १७ मते घेऊन मोहन उपसरपंच पदावर निवडून आल्याची घोषणा करताच सर्वांनी आनंदाने जल्लोष केला. टाळ्या वाजवून दोघांचे स्वागत केले. सर्व मुलांनी दोघानाही उचलून घेतलं आणि गुलाल उधळून, औक्षण करून हार घालून, पारंपारिक धनगरी डफ वाजवत गाजवत रॅली काढली. कुटुंबातील मंडळींनी आनंदाने सर्वांना चाॅकलेट, गोळ्या वाटल्या तर गावच्या सरपंचांनी बर्फी आणि चॉकलेट देऊन मुलांच्या आनंदात आपला सहभाग घेतला. आपली मुले सरपंच ,उपसरपंच म्हणून निवडून आल्याचा एक वेगळाच आनंद पालकांच्या चेहऱ्यावर दिसत होता. 

टप्पा सहावा : स्वप्रतिबिंब, मुल्यांकन एकंदरीत झालेली पूर्ण प्रक्रियेवर मुलांशी चर्चा करण्यात आली 
या निवडणुकीमध्ये आपण काय काय केल?  मुले काय शिकली? तेव्हा असे लक्षात आले कि, निवडणूक प्रक्रियेबद्दल मोडकं तोडकं  का असेना  ती सांगत होती. पण शिकवण हि चांगली घेतल्या गेली ती म्हणजे. आपल्याला हवा तसा आणि  योग्य तो माणूस यातून निवडता येतो. दुसरे असे कि, आपले मत आपण कुणाला देतो हे शेवट पर्यंत कुणालाच सांगायचे नाही आणि न दाखवता गुप्त पद्धतीने मतदान करणे या दोन बाबी मुलांना आणि मुलांना सर्वात जास्त आवडल्या. 


*****

Thursday, 5 January 2023

सहल_आठवणींचा खजिना

प्रत्येकाला स्वप्न बघण्याचा अधिकार आहे आणि ते स्वप्न पूर्ण करण्याचा अधिकार सुद्धा. पण ही स्वप्न पूर्ण करण्याची संधी प्रत्येकाच्या आयुष्यात येतेच असे नाही. त्याला परिस्थीती व काही गोष्टी या कारणीभूत असतात. अशा परिस्थितीचे जाळे व्यक्तीभोवती जास्त प्रमाणात जर झाले, तर त्याचा परिणाम स्वप्नाच्या बंधनावर नक्कीच होतो. धनगर समाज वर्षानुवर्षे जंगलातील चाकोरीबद्ध आयुष्य जगत आल्यामुळे आणि आलेल्या सामाजिक दुरावा आणि बहिष्कृत अनुभवामुळे बालनगरीतील मुलांच्या स्वप्न बघण्याच्या सहजवृत्तीला तडा जातांना आम्ही पाहिले. टाटा सामाजिक विज्ञान संस्थेचे प्राध्यापक विशाल सर यांनी जेव्हा बालनगरीच्या मुलांना एक छोटासा प्रश्न विचारला. 'तुला मोठं होऊन काय व्हायचे आहे? या प्रश्नातून मुले काय विचार करतात हे बहुदा त्यांना बघायचे असेल. परंतु इतक्या साध्या सोप्या प्रश्नाचे उत्तर सुद्धा मुलांना देता आले नाही. हा आमच्यासाठी खूप मोठा धक्का होता.

आपण अशा वयातील लहान मुलांना या प्रश्नांची उत्तर देतांना पाहिलं असेलच. त्यांना कधी पोलीस व्हायचे असते, तर कधी डॉक्टर तर कधी सीमेवरील जवान. माझ्यामते, मूल हे प्रत्येक गोष्टीचा अनुभव घेवून ते स्वप्न जगण्याचा प्रयत्न करत असतं. त्यामुळे त्याची स्वप्ने रोज बदलत जातात आणि ही अत्यंत स्वाभाविक व नैसर्गिक गोष्ट आहे.  
मोकळ्या वाटणाऱ्या जंगलातील चाकोरीबद्ध जगाच्या पलीकडे न जगल्यामुळे या मुलांचे भावविश्व फारच मर्यादित राहिले. पारंपारिकरित्या चालत आलेल्या मेंढ्या चरने या व्यवसायामुळे आणि गाव, शहर आणि इतर समुहापासून लांब असल्यामुळे येथील मुलांच्या मानसिक, सामाजिक आणि शैक्षणिक तसेच भाषिक क्षमता विकास यामध्ये तफावत पाहायला मिळते. त्यामुळेच तर बालनगरीत येणारी प्रत्येक वस्तू ही मुलांना जादू सारखी वाटते.अशा  वस्तूंची नावे बऱ्याचदा इग्रजीत असल्यामुळे उच्चारायला अवघड जाते. उदा. बॅटमिंटन,चेस, प्रोजेक्टर, स्क्रीन, स्केचपेन, क्ले, मार्करपेन, काम्पुटर इत्यादी).
प्रत्येक मूल हे स्वतंत्र आहे आणि त्यांच्या क्षमता देखील स्वतंत्र आहेत. व्यक्तिकेंद्री मुलांचा विचार केला तर इतर मुलांच्या तुलनेने या मुलांची गरज वेगळी आहे हे नमूद करावे वाटते.
बालनगरी मध्ये मुलांचे भावविश्व समृद्ध करणे आणि चौकटीच्या पलीकडे जाऊन स्वप्न पाहायला शिकवणे, त्यांना जगाची सफर घडवून अनुभूती देण्याकरिता आम्ही वेगवगळ्या माध्यमातून प्रयोग करत असतो. नुकतीच आम्ही ४ थी ते ८ वी च्या मुलांसाठी नागपूर येथील 'रामन विज्ञान केद्र' आणि महाराजा प्राणी संग्रालय येथे सहलीचे नियोजन केले. 
खरंतर हे नियोजन दोन महिन्याआधीच सुरु झालेले. बसची चौकशी करणे, जेवण हॉटेलला करायचे कि सोबत बनवून घेवून जायचे. यासाठीचा खर्च किती येईल? डॉक्टरचा सल्ला घेवून जेवण आणि आरोग्याची काळजी काय घ्यावी याबद्दल चौकशी केली. गाडी सुरक्षित असायला हवी या करीता मोठ्या खिडक्या असणारी अलिशान बस न निवडता सुरक्षित अश्या बसचा शोध घेतला . सोबतच ज्या ठिकाणी सहल जाणार तिथे चौकशी करून माहिती घेणे, बुकिंग इत्यादी कामे  व्यवस्था या बद्दल सगळे नियोजन सुरु होते. परंतु तिकडे गावामध्ये मुले आई बाबांकडून खाऊसाठी मिळणारे पाच-दहा रुपये रोज साठवून ठेवत होती.  पाचवीत शिकणाऱ्या मोहनने दोन महिन्यात असे ३६० रुपये साठवले हे विशेष. त्या पैशातून त्याने स्वत: ला १०० रुपयाचे एक घड्याळ देखील घेतले. बरीच मुले महिनाभर शेतात मजुरी करून पैसे साठवत होती. सहलीचा दिवस जवळ येता मुलांनी स्वेटर, कपडे  इस्त्री करून ठेवलेत. चपला धुवून ठेवल्या. सहली बद्दलची ही उत्सुकता मुलांमध्ये प्रत्येक दिवशी दिसत होती. आपण कसं जाणार आहोत? तिकडे काय काय पाहणार आहोत? आता किती दिवस बाकी राहिलेत? असे भरपूर प्रश्न ते विचारत होते.
अखेर तो दिवस उजाडला. पहाटे ५ वाजता बालनगरी समोर सहलीची बस येवून थांबली. गावातील सगळी मंडळी, मुलांचे आई वडील, कुटुंबातील सदस्य  पहाटे बस येण्यापूर्वीच तयार होऊन बसची वाट बघत बसलेली होती. नंदूभाऊ यांनी  बसची पूजा करून सर्व मुलामुलींना टीका लावला आणि नारळ फोडून जयघोष केला. "यळ कोट, यळ कोट, जय मल्हार.
कधीही शहर सुद्धा न पाहिलेली आमची मुले पहिल्यांदाच नागपूर सारख्या मेट्रो पोलिटीयन शहरात एक दिवस मनसोक्त फिरली ,बागडली. मोकळ्या रानात स्वच्छ निरभ्र चांदण्यांच्या आकाशापलीकडचे जग तारांगणाच्या रुपात पाहता आलं. तारांगणात सर्व ग्रह ,तारे जवळून पाहता आले. परंतू हेच आपल्या गावात असताना इतके जवळ का बरं दिसत नसतील? असाही एक प्रश्न आमच्या मुलांना पडला.
पुस्तकात वाचलेले ऐकलेले प्राणी, बाग या गोष्टी पहिल्यांदा पाहण्यात आल्या. रेल्वे हा शब्द नुसता एकीव होता, पण मेट्रो स्टेशनला गेल्यावर तिकीट काढणे, स्वयंचलीत पायऱ्यावर गमतीने चढणे, उंचावर असलेल्या लांबच लांब  चकचकीत फलाटावर मेट्रोची वाट पाहणं, स्वतःहून उघडणाऱ्या दरवाजाने आत प्रवेश करणं, मेट्रोतल्या  गर्दीत टापटीप कपड्यात दिसणारी कधी न पाहिलेली अशी माणसं. हा संपूर्ण अनुभव म्हणजे स्वप्नात आपण कुठेतरी हरवून गेल्यासारखाच निराळा. परंतु त्याहूनही वेगळे म्हणजे रामन विद्यान केंद्र, प्राणी संग्रहांलय, भोजनालय, चहा टपरी या ठिकाणी आमच्याकडे रोखून असलेली प्रश्नचिन्हांची नजर. कोण आणि कुठली ही मुले? असा जणू ते प्रश्न विचारत होती.
मला वाटतं! आपण खूप चांगलं आयुष्य जगत आलोय किंवा असं आयुष्य जगण्यासाठी आपल्या आई वडिलांनी आपल्याला जगाचा अनुभव घेण्यासाठीची संधी प्रधान केली. परंतु इथल्या समाजातील  काही व्यक्तींना  हा अनुभव मिळालाच असेल असे नाही. सहलीचा अनुभव आपल्यासारख्यांना नवीन नाही. परंतु मुलांसाठी हा संपूर्ण प्रवास म्हणजे आयुष्यभराच्या आठवणींचा सुखद खजिनाच. 
Mind Map (मुलांचे निरीक्षण)

Mind Map


***


Saturday, 9 July 2022

गोष्टीतील मानवी मूल्य

सध्याच्या डिजीटल युगात पुस्तकं हरवायला लागली आहे. मुले मोबाईल, गेमिंग आणि नवनवीन तंत्रज्ञान हाताळून पाहत आहेत. काही नामी कंपन्यांनी गोष्टीची  पुस्तकांच्या वेबसाईट,अँप्स् सुद्धा काढलेत पण या तंत्रज्ञानाचा वापर पुस्तकं वाचण्यासाठी मुले करतात का? तर निश्चितच आपल्याला हे सांगता येणार नाही. म्हणूनच मुले आणि आपण पुस्तकी जगापासून लांब जातोय कि काय अशी भीती वाटायला लागली आहे. मुलांची पुस्तकाशी मैत्री व्हायला हवी. याकरिता मुलांना बालवयापासूनच भरपूर गोष्टीची पुस्तकं वाचायला द्यायला हवीत किंबहुना आपण वाचून दाखवायला हवीत. मात्र पुस्तके देतांना त्यातील आशय कसा असायला हवा? या आशयाच्या पुस्तकांसोबत काय करावं? याविषयी थोडं सांगू इच्छितो. 

आपल्याकडे जातककथा, बोधकथा, पौराणिक गोष्टी अशी पुस्तकं बाजारात अगदी सहज उपलब्ध होतात. परंतु या  बऱ्याच पुस्तकातील कथांमध्ये तात्पर्य वा बोध सांगितल्या शिवाय कथा पूर्ण होत नाही किव्हा त्यातील पात्रे हे रंगानी, रूपांनी, किवा स्वभाव गुणांनी दुष्ट, वाईट स्वरुपाचे लिहिल्या शिवाय कथा पूर्ण होत नाही. खरंतर मुलांना त्यातून काहीतरी बोध होईल त्यांना चांगले आणि वाईट यातील फरक कळेल अश्या समजेने हि पुस्तके लिहिली जात असावी. (लोभ करू नयेअति तेथे मातीगर्वाचे घर खालीखोट्या अहंकाराने फजितीची वेळ येते. इद्यादी तात्पर्य वाचायला मिळतात)

मग प्रश्न पडतो, कि तात्पर्य असलेली पुस्तके वाचून आपल्या आयुष्यात त्याचा नक्की उपयोग होतो का? यामुळे माझे भविष्यातील वर्तन सुधारण्यासाठी किव्हा जडणघडणीकरीता मदत होते का? निश्चितच आपण याबद्दलही  आपण ठाम असे काही सांगू शकत नाही. मग अशा तात्पर्य असणाऱ्या पुस्तकांचे करायचे काय? ती वाचून दाखवू नये का? किव्हा ती निरुपयोगी आहे म्हणून टाकून द्यावे? 

दुसरा मुद्धा असा कि, अशा पुस्तकांना आपण फार जास्त महत्व दिले आहे. हे माहिती असून सुद्धा कि, प्रत्येक व्यक्ती हा वेगळा आहे आणि त्याला स्वतंत्र विचारसरणी देखील आहे. हे तत्व जर आपल्याला मान्य असेल तर बोध असणाऱ्या पुस्तकांना आपण जास्त महत्व द्यायला नको आणि तीच तत्वे अगदी जशीच्या तशी मुलांना सुद्धा लागू होतात. उदाहरणार्थ, समजा मी दहा मोठ्या मंडळींच्या गटाला तात्पर्य न सांगता पुस्तक वाचून दाखवले आणि शेवटी काही प्रश्न केलेत कि, गोष्टीत काय होत? काय आवडलं? तर नक्कीच प्रत्येकाचे उत्तर हे वेगवेगळे येतील. कुणाला त्यातील पात्र आवडतील. कुणाला कथा, तर कुणाला घटनाक्रम. म्हणजेच काय तर वाचून दाखवलेल्या पुस्तकातून प्रत्येकांचा बोध हा स्वतंत्र होता. कारण, प्रत्येकाचे भाव विश्व, अनुभव यातून झालेली त्यांची धारणा.  त्याचप्रमाणे मुलांना सुद्धा स्वत:ची विचारसरणी, भाव भावना, मते असतात आणि त्यानुसार व्यक्तीनुसार ते संदर्भ बदलत असतात. तात्पर्य म्हणजे शिकवण किंवा ते म्हणजे गोष्टीचे मर्म असे माणू नये व गोष्ट वाचून झाल्यावर शेवटी तात्पर्य सांगून मोकळे होवू नये. असे करून आपण मुलांच्या विचार प्रक्रियेला थांबवत असतो.

आम्ही मुलांसोबत पुस्तकांशी निगडीत 'गोष्टीवर चर्चा' असा उपक्रम घेत असतो. त्यासाठी मुलांच्या भावविश्वाशी निगडीत व तात्पर्य नसलेली वाचण्यायोग्य पुस्तके आणि तात्पर्य असलेली अशी पुस्तके ज्यावर चर्चा घडून येवू शकते. अशा दोन गटात पुस्तकांची विभागणी करतो. मुलांसमोर सगळ्या प्रकारची पुस्तकं वाचल्या गेली पाहिजे, असं आम्हचं मत आहे आणि ज्या पुस्तकांची निवड केली त्यात मानवी मूल्य जोपासली गेली असेल. कुणाची अवहेलना, विटंबना तर होत नाही ना, याची चाचपणी करतो. मग तात्पर्य न सांगता मुलांसोबत काम कसे करता येईल?  याकरिता आम्ही तात्पर्य असणाऱ्या पुस्तकातील गुराखी आणि लांडग्याची गोष्ट वाचून दाखवली. ती तुमच्याकरिता थोडक्यात अशी,

एका गावातील काही लोकं गुरांना चरायला जंगलात नेत असतात. दिवस भर जंगलात राहायचे असल्यामुळे ते सोबत दुपारच्या जेवणाचा डबा (शिदोरी) घेऊन जातात. सगळे गुराखी प्रत्येकाचा डबा एका झाडाच्या डोलीत ठेवतात आणि दुपार झाली की, एकत्र जेवण करतात. हे कोल्हा रोज पाहत असतो. एके दिवशी झाड्याच्या डोलीतील सगळ्या भाकरी कोल्हा खाऊन टाकतो. असे तो रोज करू लागल्यामुळे गुराख्यांची उपासमार होऊ लागली. दुसऱ्या दिवशी गुराख्यांनी कोल्हा आपल्या भाकरी खातो हे पहिले. आणि त्याला चांगली अद्दल घडवायची  असे ठरवले. सगळ्यांनी एकदा आपल्या  भाकरी झाडाच्या ढोलीत ठेवल्या. कोल्हाने पुन्हा भाकरी खाण्याचा प्रयत्न केला. सर्व गुराख्यांनी कोल्ह्याला घेरले आणि जवळ असलेल्या लाठी काठीने त्याला ठार मारले.

मग काय घडले गोष्टीत?

एक कोल्हा होता. तो गुराखींच्या भाकऱ्या खाऊन टाकत होता.

मग पुढे काय झालं?

त्या लोकांनी त्याला चांगला धडा शिकवला.

मला वाटते त्यांनी असं नको करायला होतं, म्हणजे त्याला मारायला नको होतं, तुम्हाला काय वाटतं?

त्यांनी बरोबर केलं दादा, त्याने भाकऱ्या खाल्ल्या आणि त्याने चोरी केली. त्याच्यामुळे लोकांना उपाशी राहावं लागलं.

हो बरोबर आहे तुमचं. त्या कोल्ह्यामुळे त्यांना उपाशी रहावं लागलं? पण मग मला एका प्रश्नांचे उत्तर द्याल.. जर आपल्या पैकी कुणाला जर भूक लागली आणि त्याने मी घरी नसतांना घरी येऊन भाकरी खाल्ली तर मी काय करायला पाहिजे? 

(१) दादा, त्याला पकडून पोलिसात द्यायला पाहिजे.

(२) त्याला समजवायला पाहिजे, परत असे करू नकोस.

(३) त्याला कानाखाली लावायला पाहिजे.

मला तुमचं पटलं. आपण त्याला समजवायला पाहिजे, कि असे परत करू नकोस. आपण भाकरी खाल्ली म्हणून त्याला पोलिसात देणार नाही. कारण, त्याला भूक लागली असेल म्हणूनच त्याने भाकरी घेतली ना. मग भूक लागलेल्या माणसाला आपण मारणार का?

नाही दादा.

मी त्याला समज दिली असती.

आता मला दुसऱ्या प्रश्नांचे उत्तर द्या. गोष्टीतील कोल्ह्याला पण भूक लागली असेल ना.

हो.

म्हणून तो भाकरी खात होता.

हो.

मग गुराख्यांनी काय करायला पाहिजे होतं?

दादा, त्याला मारून टाकायला नको होतं. त्याला सोडून द्यायला पाहिजे होतं.

पण जर त्याला परत भूक लागली आणि परत त्याने भाकरी चोरली असती तर?

त्या लोकांनी त्याच्याकरिता एक एक भाकरी अजून (अतिरिक्त) घेवून यायला पाहिजे होती, म्हणजे दोघांची पोटं भरली असती.

प्रथम त्या कोल्ह्याने वाईट केलं म्हणून त्याला ठार मारले हे योग्य होतं अशी मत असणारी मुले नंतर प्रत्येकाने एक भाकरी आणायला हवी या माणुसकीची आणि सहज उपायावरती येणे, माझ्यामते हि मुलांची मोठी वैचारिक उडी होती. कोणत्याही प्रकारची हिंसा करणे हे वाईटच. मग ती हिंसा छोट्या स्वरूपातील असो कि मोठ्या ‘ ती हिंसाच असते’. मुलांना मानवी मूल्य आणि सद्भावनेची जाणीव निर्माण करणे आणि त्यांना एक माणूस म्हणून विचार करायला लावणे अशा उपक्रमातून साध्य होतं आणि नक्कीच हि बाब सहजा-सहजी एका सत्राने येणारी नाहीच. याकरिता मुलांसमोर अशी पुस्तके घेवून त्यावर वेगवेगळ्या अंगांनी चर्चा करेने गरजेचे आहे. त्यातून प्रत्येक मुलाला स्वतःचे मत मांडायला मिळते. शिवाय माझे मत कसेही असले तरी ते ग्राह्य धरल्या जाते, माझ्या मताला इथे किंमत आहे आणि मी मांडलेल्या मतावर कुणी न हसता माझ्या मताचा इथे स्वीकार होतो. हा विश्वास निर्माण व्हायला मदत होते आणि यातूनच निर्माण होईल एक विचारमूल्य, माणसाने माणसाशी माणसासम वागणे. 

- लेखन -

धम्मानंद

https://www.oveetrust.org/

Saturday, 18 June 2022

शिक्षण प्रवाहातील छकुली ?

बालनगरीमध्ये सध्या धनगर समाजाच्या ४० मुली शिक्षण घेत आहेत. बघायला गेलं तर इथे प्रत्येक मुलामुलींचा संघर्ष तुम्हाला सांगण्यासारखा आहे. त्यापैकीच एक म्हणजे आमची छकुली. सध्या ती ९ वर्षाची असून. नावाप्रमाणेच उंचीने लहान, अंगाने बारीक, मिश्कील हसणारी अशी ती. अगदी पहिल्या दिवसांपासून ती बालनगरीमध्ये दररोज येते. तिचे आई वडील जंगलात पाल टाकून बेड्यावर राहतात आणि ती आपल्या आजी सोबत गावात. तिच्या आई बाबांचे बेडं हे गावाच्या जवळच असल्यामुळे, ती कधी आई बाबांसोबत राहते, तर कधी आजी सोबत गावाला राहते. (जंगलात किंवा दुसऱ्यांच्या शेतात पाल टाकून त्या ठिकाणी सहा महिने किंवा त्यापेक्षा जास्त दिवस राहणे. त्याला धनगरी समाजात बेडे किवा बेडं असे म्हणतात.) 

आम्ही जेव्हा जेव्हा दुपारच्या वेळेला बालनगरीला गेलो कितेव्हा तेव्हा आम्ही तिला डोक्यावर कळशी किव्हा हंड्याने पाणी भरतांनाच पाहिले. बहुतेक घरातील पाणी भरण्याची जबादारी तिलाच दिलेली असावी. असो, तिचे घाई-घाईने पाणी भरून झाले, कि केस बीस विंचरून छान तयारी करून बालनगरीला ती यायची. नंतर अचानक ती आपल्या आई- वडिलांकडे बेड्यावर राहायला गेली. पण तिने बालनगरीला येण्याचे टाळले नाही. शिकायची जिद्द आणि आवड असल्यामुळे ती दर दुपारी तीन वाजता बेड्यावरून आपल्या आजीसोबत एक पाण्याचा रिकामा हंडा घेवून बालनगरीला यायची. गटात बसून शिकायची आणि संध्याकाळचे साडे सहा वाजले किपाण्याचा हंडा भरून आजी सोबत परत बेड्यावर जायची. असे बरेच दिवस तिने जाने येणे केले.

स्वच्छ अंघोळ करून, वेणी बांधून, स्वच्छ आणि आवडीचा केशरी रंगाचा एकच ड्रेस घालून बालनगरीला नियमित वेळेवर येणे, प्रत्येक उपक्रमात सहभागी होणे, खेळणे, गाणी म्हणणे, अभ्यास करणे, पुस्तक वाचणे, चित्र काढणे, नाहीतर भिंतीवरील लावलेले उतारे वाचणे. असे न चुकता तिचे सुरु असायचे. दोन वर्षापूर्वी लिहिता वाचता न येणाऱ्या छकुलीला काही महिन्यातच १ ते ६० अंक ओळख आणि वाचन यायला लागले. अक्षर परिचय, शब्द आणि त्यापासूनची छोटी छोटी वाक्य वाचता येवू लागली होती. आम्ही जी गोष्टीची पुस्तकं रोज वाचून दाखवायचो ते पुस्तकं ती वाचून पाहण्याचा प्रयत्न करत होती. एकेक वाक्य असेलेली गोष्टीची छोटी पुस्तके तिला सहज वाचून समजून घेता येवू लागली. त्याचबरोबर गणितीक्रिया मध्ये बिनहातच्याचीहातच्याची बेरीज-वजाबाकी सुद्धा काड्या गट्याच्या सहाय्याने करता येवू लागली. एवढी सगळी काम करत एवढ्याश्या जीवाने शिक्षणाचा प्रवाह मात्र कधी तुटू दिला नाही.

शिक्षणाबद्दलची आवड आणि
जिद्द पाहून आम्ही भारावून गेलो आणि छकुलीची प्रगती तिच्या आई वडिलांना कळवावी असे आम्हाला वाटू लागले. एक दिवस वेळ काढून आम्ही छकुलीच्या बेड्यावर जायचे ठरवले. मोहन (छकुलीचा भाऊ) त्याला व छकुलीला सोबत घेवून जंगलाच्या वाटेने बेड्यावर पोहचलो. तिच्या आई वडिलांना भेटून छकुलीला लिहिता वाचता येतं, गणित करता येतं. ती कशी हुशार आहे. ती जर आज्जी सोबत गावातच राहिली तर तिचं शिक्षण चांगल होऊ शकेल. याविषयी आमच्या गप्पा झाल्या. 
आपल्या मुलांचं कौतुक ऐकून त्यांना खूप बरं वाटलं. स्टीलच्या प्लेट मध्ये चहा घेत त्यांनी समाधान व्यक्त केलं.

छकुलीने बरेच दिवस असेच सुरु असतांना अचानक एक दिवस आम्ही बालनगरीला जातांना मेंढ्यांचा कळप घेवून छकुलीची आजी आणि तिचा भाऊ जातांना दिसले. सोबत भलेमोठे सामान असलेली बैलगाडी आणि बाजूने आई, बाबा चालतांना दिसले. हे चित्र पाहून माझ्या मनात धक्क झालं. मी त्यांना विचारले, कोणत्या गावाला जात आहातपरत कधी येणार?

आता, सहा महिन्या नंतरच येवू.

आणि पोरांच्या शिक्षणाचं काय?

प्रश्नाचे उत्तर न देताच ते निघून गेले.

शिक्षणाच्या प्रवाहात येवू पाहणाऱ्या छकुलीला बघून जितका आनंद वाटत होता, त्यापेक्षा जास्त दुःख हे तिला प्रवाहातून बाहेर जातांनाचे होते. सहा एक महिन्यानंतर छकुली परत बालनगरीला आली खरी पण ती बरंच काही विसरलेली होती. आता तिला पुन्हा नव्याने त्याच गोष्टीकरिता संघर्ष करावा लागणार. परंतु असे किती दिवस ती करू शकेल? तिचा आई वडिलांना तिची धडपड, शिक्षणाविषयीची तिची तळमळ कळेल का? अशिक्षित, अंधश्रद्धा आणि शिक्षणापासून वंचित असलेला हा धनगर समाज हा पोटाची खडगी भरण्यासाठी अजूनही पारंपारिक व्यवसायच करतोय. मेंढपाळ व्यवसाय म्हणजे त्यांचा धर्मच जणू. अशा भटकंती प्रवाहाबरोबर शिक्षणाचे कार्य जरी अवघड असले, तरी अशा कितीतरी छकुली  ह्या शिक्षणाच्या प्रवाहाच्या बाहेर आहेत. त्यांना प्रवाहात आणायचे असेल तर पालकांनी आपल्या मुलांप्रती जागृत होणे गरजेचे आहे.

(छकुली व तिची आजी)







Visit On: www.oveetrust.org

 









Sunday, 5 June 2022

पुस्तक चोरीला गेलं!

आमच्या मुलांना पुस्तकातील गोष्ट म्हणजे एखादा चित्रपटच वाटतो.  पुस्तकातील गोष्टी ऐकणे, वाचणे हे मुलांना खूप आवडतं. आम्ही एखादं गोष्टीचं पुस्तक वाचताना ते जर मोठ्या आशयाचं असेल तर ते आम्ही दोन भागात विभागून पुढील गोष्ट दुसऱ्या दिवशी वाचून दाखवतो. पण मुलांना तसं नको असतं. त्यांना पुस्तक कितीही मोठं असलं तरी त्या पुस्तकाच्या कथेत शेवटी काय घडतं हे जाणून घेण्याची उत्सुकता फार लागलेली असते.

आम्ही बालनागरी मध्ये 'जमिनीवरील ग्रंथालय' नावाचा उपक्रम घेत असतो. जमिनीवर पेपर अंथरून त्यावर पुस्तके ठेवली जातात व सर्वांनी एकेक करून ती वाचत बसायची. ज्यांना वाचता येत नाही त्यांनी त्यातील चित्र बघून गोष्ट काय असेल याचा अंदाज घ्यायचा. एकदा असाच हा उपक्रम सुरु असतांना अर्धा तासानंतर अचानक मुले ओरडली. दादाSS, दादाss.

‘काय झालं?

दादा ! 'पुस्तक चोरलं', ओमशंकर म्हणाला!

कुणी नेलं?

दादा, तो पोरगा नवीन हाये. आज पहिल्यांदाच शाळेत आलाय. 

(पुस्तक चोरीला जाणं! हि घटना खूप भारी वाटली, पण आधीच पुस्तकाचा तुटवडा. नेलेलं पुस्तक परत आणून दिले तर ठीक. फाटले बिटले तर? असे विचार डोक्यात आले. घटना जरी छान असली तरी पुस्तक आणि पुस्तकवाला मिळायला  हवे, असा विचार करून मी मुलांना म्हणालो)

हो का? मग आता काय करायचं?

जाऊन घेऊन येवू का पुस्तक? आम्हाले त्याचं घर माहीत हाये.

बरं जा. पण त्याला मारू-बिरू नका आणि त्याला तुमच्या सोबतच घेऊन या?

हो दादा, असं म्हणून पाच दहा पोरं पळाली. तो मुलगा घरी न जाता कुठे तरी लपून बसलेला असावा. त्यामुळे तो मुलांना काही भेटला नाही. मुले बिचारी रिकाम्या हातानी आली आणि म्हणाली कि, तो काही गावला नाही दादा पण आम्ही त्याला शोधून काढतो आणि त्याच्याकडून पुस्तक पण घेऊन ठेवतो.’  

काही दिवसांनी बालनगरीचा दरवाचा बसवण्याचे काम सुरू होते. त्या कामात आम्ही व्यस्त होतो. मुलांना काही काम नसल्यामुळे ती आमच्या मागे-मागे फिरत होती. दरवाजा लावण्याच्या प्रक्रियेचा आनंद घेत होती. तितक्यात ओमशंकरला पुस्तक नेणारा मुलगा दिसला व त्याला पुस्तकाची आठवण झाली. मला काहीच न सांगता मुलं त्या मुलाला पुस्तकासाहित घेऊन आली. दादा ह्यो बघा, ह्यांनीच पुस्तक नेलं होतं. 

या मुलाने नेमकं कोणतं पुस्तक नेलेलं हे पाहण्यासाठी त्याच्याजवळील मी पुस्तक घेतलं. 

'आई समान कुणीही नाही!' असं त्या पुस्तकाचं नाव.


मला माहिती होतं कि, या मुलाला वाचता लिहिता येत नाही, मग पुस्तक त्याने का नेलं असावं? तर त्या पुस्तकाच्या मुखपृष्ठावर आई आणि मुलगा शिकार करतानाचे चित्र होते आणि आमच्या सगळ्या मुलांचे आयुष्य हे जंगलाच्या सानिध्यात असल्यामुळे कदाचित ते चित्र त्याला आवडले असावे. तो मुलगा कुणाशीही नजर मिळवत नव्हता. मी इतर मुलांना सांगितलं की, तो चोर नाही आहे, त्याला पुस्तक आवडलं होतं म्हणून त्याने ते नेलं. पण असं करायचं नाही, तुम्हाला जर पुस्तक वाचायला, पाहायला पाहिजे असेल तेव्हा मला एकदा सांगून घेऊन जा. ही पुस्तके सगळ्यांसाठीच आहेत. 

मुलांना मी ते पुस्तक दिले. पुस्तक हातात पडताच सगळी मुलं त्यातील चित्र पाहत बाकावर बसली होती. चित्रे पाहतांना मुले एकमेकांशी बोलू लागली. थोड्या वेळातच त्या पुस्तकाभोवती मुलांनी खुप गर्दी केली.

माझं लक्ष त्यांकडे होतं पण मनात विचार आला. ‘पुस्तक फाटेल की काय’. त्यावर मी त्यांना ते पुस्तक आत ठेवून द्यायला सांगितले. पण मुलांच्या हातून पुस्तक काही सुटेना. इकडे साडे सहा वाजायला आलेले, बऱ्यापैकी अंधार व्हायला सुरुवात झाली होती. तितक्यात पोरांनी दादा हे पुस्तक वाचून दाखवाणा असं म्हणत माझा हात ओढू लागली. चोरीला गेलेल्या पुस्तकात नेमकी कोणती कथा आहे, ज्यात शिकारीची इतकी भन्नाट चित्रे आहेत हे मुलांना जाणून घ्यायचे होते. मला हे लक्षात आलं. मग आम्ही आहे त्या स्थितीत मुलांना गोष्ट वाचून दाखवली. सोबतच ज्या मुलाने हे पुस्तक नेले होते त्यालाही समोर बसवले.

इकडे दरवाज्याचा ठकSS ठकSS ठकSS ठकSS असा आवाज आणि जोडीला सायंकाळचा अंधार त्यामुळे शिकारीची गोष्ट अजूनच रंगली. गोष्ट संपली आणि मुलं म्हणाली, ‘दादा, लय भारी होती गोष्ट!’ उद्या अजून एकदा वाचून दाखवाल.


-------------------------
अनुभव लेखन: धम्मानंद 
 www.oveetrust.org

कुल्फी अंकातील रहस्य.

  बबिताने चोरी केली का? 'कुल्फी' हा आमच्या मुलांचा आवडीचा अंक. या अंकाची मुले वाट पाहत असतात. बालकट्टा सेंटरला मुलांना कुल्फी अंक हा...