
सध्याच्या
डिजीटल युगात पुस्तकं हरवायला लागली आहे. मुले मोबाईल, गेमिंग आणि नवनवीन
तंत्रज्ञान हाताळून पाहत आहेत. काही नामी कंपन्यांनी गोष्टीची पुस्तकांच्या वेबसाईट,अँप्स् सुद्धा काढलेत पण या तंत्रज्ञानाचा वापर पुस्तकं वाचण्यासाठी मुले करतात का? तर निश्चितच आपल्याला हे सांगता येणार नाही. म्हणूनच मुले आणि आपण पुस्तकी जगापासून लांब जातोय कि काय अशी भीती वाटायला लागली आहे. मुलांची पुस्तकाशी मैत्री व्हायला हवी. याकरिता मुलांना बालवयापासूनच भरपूर गोष्टीची पुस्तकं वाचायला द्यायला हवीत किंबहुना आपण वाचून दाखवायला हवीत. मात्र पुस्तके देतांना त्यातील आशय कसा असायला हवा? या आशयाच्या पुस्तकांसोबत काय करावं? याविषयी थोडं सांगू इच्छितो.
आपल्याकडे जातककथा, बोधकथा, पौराणिक गोष्टी अशी पुस्तकं बाजारात अगदी सहज उपलब्ध होतात. परंतु या बऱ्याच पुस्तकातील कथांमध्ये तात्पर्य वा बोध सांगितल्या शिवाय कथा पूर्ण होत नाही किव्हा त्यातील पात्रे हे रंगानी, रूपांनी, किवा स्वभाव गुणांनी दुष्ट, वाईट स्वरुपाचे लिहिल्या शिवाय कथा पूर्ण होत नाही. खरंतर मुलांना त्यातून काहीतरी बोध होईल त्यांना चांगले आणि वाईट यातील फरक कळेल अश्या समजेने हि पुस्तके लिहिली जात असावी. (लोभ करू नये, अति तेथे माती, गर्वाचे घर खाली, खोट्या अहंकाराने फजितीची वेळ येते. इद्यादी तात्पर्य वाचायला मिळतात)
मग प्रश्न पडतो, कि तात्पर्य असलेली पुस्तके वाचून आपल्या आयुष्यात त्याचा नक्की उपयोग होतो का? यामुळे माझे भविष्यातील वर्तन सुधारण्यासाठी किव्हा जडणघडणीकरीता मदत होते का? निश्चितच आपण याबद्दलही आपण ठाम असे काही सांगू शकत नाही. मग अशा तात्पर्य असणाऱ्या पुस्तकांचे करायचे काय? ती वाचून दाखवू नये का? किव्हा ती निरुपयोगी आहे म्हणून टाकून द्यावे?
दुसरा मुद्धा असा कि, अशा पुस्तकांना आपण फार जास्त महत्व दिले आहे. हे माहिती असून सुद्धा कि, प्रत्येक व्यक्ती हा वेगळा आहे आणि त्याला स्वतंत्र विचारसरणी देखील आहे. हे तत्व जर आपल्याला मान्य असेल तर बोध असणाऱ्या पुस्तकांना आपण जास्त महत्व द्यायला नको आणि तीच तत्वे अगदी जशीच्या तशी मुलांना सुद्धा लागू होतात. उदाहरणार्थ, समजा मी दहा मोठ्या मंडळींच्या गटाला तात्पर्य न सांगता पुस्तक वाचून दाखवले आणि शेवटी काही प्रश्न केलेत कि, गोष्टीत काय होत? काय आवडलं? तर नक्कीच प्रत्येकाचे उत्तर हे वेगवेगळे येतील. कुणाला त्यातील पात्र आवडतील. कुणाला कथा, तर कुणाला घटनाक्रम. म्हणजेच काय तर वाचून दाखवलेल्या पुस्तकातून प्रत्येकांचा बोध हा स्वतंत्र होता. कारण, प्रत्येकाचे भाव विश्व, अनुभव यातून झालेली त्यांची धारणा. त्याचप्रमाणे मुलांना सुद्धा स्वत:ची
विचारसरणी, भाव
भावना, मते असतात आणि त्यानुसार व्यक्तीनुसार ते संदर्भ बदलत असतात. तात्पर्य म्हणजे शिकवण किंवा ते म्हणजे गोष्टीचे मर्म असे माणू नये व गोष्ट वाचून झाल्यावर शेवटी तात्पर्य सांगून मोकळे होवू नये. असे करून आपण मुलांच्या विचार प्रक्रियेला थांबवत असतो.
आम्ही मुलांसोबत पुस्तकांशी निगडीत 'गोष्टीवर चर्चा' असा उपक्रम घेत असतो. त्यासाठी मुलांच्या भावविश्वाशी निगडीत व तात्पर्य नसलेली वाचण्यायोग्य पुस्तके आणि तात्पर्य असलेली अशी पुस्तके ज्यावर चर्चा घडून येवू शकते. अशा दोन गटात पुस्तकांची विभागणी करतो. मुलांसमोर सगळ्या प्रकारची पुस्तकं वाचल्या गेली पाहिजे, असं आम्हचं मत आहे आणि ज्या पुस्तकांची निवड केली त्यात मानवी मूल्य जोपासली गेली असेल. कुणाची अवहेलना, विटंबना तर होत नाही ना, याची चाचपणी करतो. मग तात्पर्य न सांगता मुलांसोबत काम कसे करता येईल? याकरिता आम्ही तात्पर्य असणाऱ्या पुस्तकातील गुराखी आणि लांडग्याची गोष्ट वाचून दाखवली. ती तुमच्याकरिता थोडक्यात अशी,
एका
गावातील काही लोकं गुरांना चरायला जंगलात नेत असतात. दिवस भर जंगलात राहायचे असल्यामुळे
ते सोबत दुपारच्या जेवणाचा डबा (शिदोरी) घेऊन जातात. सगळे गुराखी
प्रत्येकाचा डबा एका झाडाच्या डोलीत ठेवतात आणि दुपार झाली की, एकत्र जेवण करतात. हे कोल्हा रोज पाहत असतो. एके दिवशी झाड्याच्या डोलीतील सगळ्या भाकरी कोल्हा खाऊन टाकतो. असे तो रोज
करू लागल्यामुळे गुराख्यांची उपासमार होऊ लागली. दुसऱ्या दिवशी गुराख्यांनी कोल्हा
आपल्या भाकरी खातो हे पहिले. आणि त्याला चांगली अद्दल घडवायची असे ठरवले. सगळ्यांनी एकदा आपल्या
भाकरी झाडाच्या ढोलीत
ठेवल्या. कोल्हाने पुन्हा भाकरी खाण्याचा प्रयत्न केला. सर्व गुराख्यांनी
कोल्ह्याला घेरले आणि जवळ असलेल्या लाठी काठीने त्याला ठार मारले.
मग काय घडले गोष्टीत?
एक कोल्हा होता. तो गुराखींच्या भाकऱ्या खाऊन
टाकत होता.
मग पुढे काय झालं?
त्या लोकांनी त्याला चांगला धडा शिकवला.
मला वाटते त्यांनी असं नको करायला होतं, म्हणजे
त्याला मारायला नको होतं, तुम्हाला काय वाटतं?
त्यांनी बरोबर केलं दादा, त्याने भाकऱ्या खाल्ल्या
आणि त्याने चोरी केली. त्याच्यामुळे लोकांना उपाशी राहावं लागलं.
हो बरोबर आहे तुमचं. त्या कोल्ह्यामुळे त्यांना उपाशी रहावं लागलं? पण मग मला एका प्रश्नांचे उत्तर द्याल.. जर आपल्या पैकी कुणाला जर भूक लागली आणि त्याने मी घरी नसतांना घरी येऊन भाकरी खाल्ली तर मी काय करायला पाहिजे?
(१) दादा, त्याला पकडून पोलिसात द्यायला पाहिजे.
(२) त्याला समजवायला पाहिजे, परत असे करू नकोस.
(३) त्याला कानाखाली लावायला पाहिजे.
मला तुमचं पटलं. आपण त्याला समजवायला पाहिजे, कि
असे परत करू नकोस. आपण भाकरी खाल्ली म्हणून त्याला पोलिसात देणार नाही. कारण,
त्याला भूक लागली असेल म्हणूनच त्याने भाकरी घेतली ना. मग भूक लागलेल्या माणसाला
आपण मारणार का?
नाही दादा.
मी त्याला समज दिली असती.
आता मला दुसऱ्या प्रश्नांचे उत्तर द्या.
गोष्टीतील कोल्ह्याला पण भूक लागली असेल ना.
हो.
म्हणून तो भाकरी खात होता.
हो.
मग गुराख्यांनी काय करायला पाहिजे होतं?
दादा, त्याला मारून टाकायला नको होतं. त्याला
सोडून द्यायला पाहिजे होतं.
पण जर त्याला परत भूक लागली आणि परत त्याने
भाकरी चोरली असती तर?
त्या लोकांनी त्याच्याकरिता एक एक भाकरी अजून
(अतिरिक्त) घेवून यायला पाहिजे होती, म्हणजे दोघांची पोटं भरली असती.
प्रथम त्या कोल्ह्याने वाईट केलं म्हणून त्याला ठार मारले हे योग्य होतं अशी मत असणारी मुले नंतर प्रत्येकाने एक भाकरी आणायला हवी या माणुसकीची आणि सहज उपायावरती येणे, माझ्यामते हि मुलांची मोठी वैचारिक उडी होती. कोणत्याही प्रकारची हिंसा करणे हे
वाईटच. मग ती हिंसा छोट्या स्वरूपातील असो कि मोठ्या ‘ ती हिंसाच असते’. मुलांना मानवी
मूल्य आणि सद्भावनेची जाणीव निर्माण करणे आणि त्यांना एक माणूस म्हणून विचार
करायला लावणे अशा उपक्रमातून साध्य होतं आणि नक्कीच हि बाब सहजा-सहजी एका सत्राने येणारी नाहीच. याकरिता मुलांसमोर अशी पुस्तके घेवून त्यावर वेगवेगळ्या अंगांनी चर्चा करेने गरजेचे आहे. त्यातून प्रत्येक मुलाला स्वतःचे मत मांडायला मिळते. शिवाय माझे मत कसेही असले तरी ते ग्राह्य धरल्या जाते, माझ्या मताला इथे किंमत आहे आणि मी मांडलेल्या मतावर कुणी न हसता माझ्या मताचा इथे स्वीकार होतो. हा विश्वास निर्माण व्हायला मदत होते आणि यातूनच निर्माण होईल एक विचारमूल्य, माणसाने माणसाशी माणसासम वागणे.
- लेखन -
धम्मानंद
https://www.oveetrust.org/