Thursday, 5 January 2023

सहल_आठवणींचा खजिना

प्रत्येकाला स्वप्न बघण्याचा अधिकार आहे आणि ते स्वप्न पूर्ण करण्याचा अधिकार सुद्धा. पण ही स्वप्न पूर्ण करण्याची संधी प्रत्येकाच्या आयुष्यात येतेच असे नाही. त्याला परिस्थीती व काही गोष्टी या कारणीभूत असतात. अशा परिस्थितीचे जाळे व्यक्तीभोवती जास्त प्रमाणात जर झाले, तर त्याचा परिणाम स्वप्नाच्या बंधनावर नक्कीच होतो. धनगर समाज वर्षानुवर्षे जंगलातील चाकोरीबद्ध आयुष्य जगत आल्यामुळे आणि आलेल्या सामाजिक दुरावा आणि बहिष्कृत अनुभवामुळे बालनगरीतील मुलांच्या स्वप्न बघण्याच्या सहजवृत्तीला तडा जातांना आम्ही पाहिले. टाटा सामाजिक विज्ञान संस्थेचे प्राध्यापक विशाल सर यांनी जेव्हा बालनगरीच्या मुलांना एक छोटासा प्रश्न विचारला. 'तुला मोठं होऊन काय व्हायचे आहे? या प्रश्नातून मुले काय विचार करतात हे बहुदा त्यांना बघायचे असेल. परंतु इतक्या साध्या सोप्या प्रश्नाचे उत्तर सुद्धा मुलांना देता आले नाही. हा आमच्यासाठी खूप मोठा धक्का होता.

आपण अशा वयातील लहान मुलांना या प्रश्नांची उत्तर देतांना पाहिलं असेलच. त्यांना कधी पोलीस व्हायचे असते, तर कधी डॉक्टर तर कधी सीमेवरील जवान. माझ्यामते, मूल हे प्रत्येक गोष्टीचा अनुभव घेवून ते स्वप्न जगण्याचा प्रयत्न करत असतं. त्यामुळे त्याची स्वप्ने रोज बदलत जातात आणि ही अत्यंत स्वाभाविक व नैसर्गिक गोष्ट आहे.  
मोकळ्या वाटणाऱ्या जंगलातील चाकोरीबद्ध जगाच्या पलीकडे न जगल्यामुळे या मुलांचे भावविश्व फारच मर्यादित राहिले. पारंपारिकरित्या चालत आलेल्या मेंढ्या चरने या व्यवसायामुळे आणि गाव, शहर आणि इतर समुहापासून लांब असल्यामुळे येथील मुलांच्या मानसिक, सामाजिक आणि शैक्षणिक तसेच भाषिक क्षमता विकास यामध्ये तफावत पाहायला मिळते. त्यामुळेच तर बालनगरीत येणारी प्रत्येक वस्तू ही मुलांना जादू सारखी वाटते.अशा  वस्तूंची नावे बऱ्याचदा इग्रजीत असल्यामुळे उच्चारायला अवघड जाते. उदा. बॅटमिंटन,चेस, प्रोजेक्टर, स्क्रीन, स्केचपेन, क्ले, मार्करपेन, काम्पुटर इत्यादी).
प्रत्येक मूल हे स्वतंत्र आहे आणि त्यांच्या क्षमता देखील स्वतंत्र आहेत. व्यक्तिकेंद्री मुलांचा विचार केला तर इतर मुलांच्या तुलनेने या मुलांची गरज वेगळी आहे हे नमूद करावे वाटते.
बालनगरी मध्ये मुलांचे भावविश्व समृद्ध करणे आणि चौकटीच्या पलीकडे जाऊन स्वप्न पाहायला शिकवणे, त्यांना जगाची सफर घडवून अनुभूती देण्याकरिता आम्ही वेगवगळ्या माध्यमातून प्रयोग करत असतो. नुकतीच आम्ही ४ थी ते ८ वी च्या मुलांसाठी नागपूर येथील 'रामन विज्ञान केद्र' आणि महाराजा प्राणी संग्रालय येथे सहलीचे नियोजन केले. 
खरंतर हे नियोजन दोन महिन्याआधीच सुरु झालेले. बसची चौकशी करणे, जेवण हॉटेलला करायचे कि सोबत बनवून घेवून जायचे. यासाठीचा खर्च किती येईल? डॉक्टरचा सल्ला घेवून जेवण आणि आरोग्याची काळजी काय घ्यावी याबद्दल चौकशी केली. गाडी सुरक्षित असायला हवी या करीता मोठ्या खिडक्या असणारी अलिशान बस न निवडता सुरक्षित अश्या बसचा शोध घेतला . सोबतच ज्या ठिकाणी सहल जाणार तिथे चौकशी करून माहिती घेणे, बुकिंग इत्यादी कामे  व्यवस्था या बद्दल सगळे नियोजन सुरु होते. परंतु तिकडे गावामध्ये मुले आई बाबांकडून खाऊसाठी मिळणारे पाच-दहा रुपये रोज साठवून ठेवत होती.  पाचवीत शिकणाऱ्या मोहनने दोन महिन्यात असे ३६० रुपये साठवले हे विशेष. त्या पैशातून त्याने स्वत: ला १०० रुपयाचे एक घड्याळ देखील घेतले. बरीच मुले महिनाभर शेतात मजुरी करून पैसे साठवत होती. सहलीचा दिवस जवळ येता मुलांनी स्वेटर, कपडे  इस्त्री करून ठेवलेत. चपला धुवून ठेवल्या. सहली बद्दलची ही उत्सुकता मुलांमध्ये प्रत्येक दिवशी दिसत होती. आपण कसं जाणार आहोत? तिकडे काय काय पाहणार आहोत? आता किती दिवस बाकी राहिलेत? असे भरपूर प्रश्न ते विचारत होते.
अखेर तो दिवस उजाडला. पहाटे ५ वाजता बालनगरी समोर सहलीची बस येवून थांबली. गावातील सगळी मंडळी, मुलांचे आई वडील, कुटुंबातील सदस्य  पहाटे बस येण्यापूर्वीच तयार होऊन बसची वाट बघत बसलेली होती. नंदूभाऊ यांनी  बसची पूजा करून सर्व मुलामुलींना टीका लावला आणि नारळ फोडून जयघोष केला. "यळ कोट, यळ कोट, जय मल्हार.
कधीही शहर सुद्धा न पाहिलेली आमची मुले पहिल्यांदाच नागपूर सारख्या मेट्रो पोलिटीयन शहरात एक दिवस मनसोक्त फिरली ,बागडली. मोकळ्या रानात स्वच्छ निरभ्र चांदण्यांच्या आकाशापलीकडचे जग तारांगणाच्या रुपात पाहता आलं. तारांगणात सर्व ग्रह ,तारे जवळून पाहता आले. परंतू हेच आपल्या गावात असताना इतके जवळ का बरं दिसत नसतील? असाही एक प्रश्न आमच्या मुलांना पडला.
पुस्तकात वाचलेले ऐकलेले प्राणी, बाग या गोष्टी पहिल्यांदा पाहण्यात आल्या. रेल्वे हा शब्द नुसता एकीव होता, पण मेट्रो स्टेशनला गेल्यावर तिकीट काढणे, स्वयंचलीत पायऱ्यावर गमतीने चढणे, उंचावर असलेल्या लांबच लांब  चकचकीत फलाटावर मेट्रोची वाट पाहणं, स्वतःहून उघडणाऱ्या दरवाजाने आत प्रवेश करणं, मेट्रोतल्या  गर्दीत टापटीप कपड्यात दिसणारी कधी न पाहिलेली अशी माणसं. हा संपूर्ण अनुभव म्हणजे स्वप्नात आपण कुठेतरी हरवून गेल्यासारखाच निराळा. परंतु त्याहूनही वेगळे म्हणजे रामन विद्यान केंद्र, प्राणी संग्रहांलय, भोजनालय, चहा टपरी या ठिकाणी आमच्याकडे रोखून असलेली प्रश्नचिन्हांची नजर. कोण आणि कुठली ही मुले? असा जणू ते प्रश्न विचारत होती.
मला वाटतं! आपण खूप चांगलं आयुष्य जगत आलोय किंवा असं आयुष्य जगण्यासाठी आपल्या आई वडिलांनी आपल्याला जगाचा अनुभव घेण्यासाठीची संधी प्रधान केली. परंतु इथल्या समाजातील  काही व्यक्तींना  हा अनुभव मिळालाच असेल असे नाही. सहलीचा अनुभव आपल्यासारख्यांना नवीन नाही. परंतु मुलांसाठी हा संपूर्ण प्रवास म्हणजे आयुष्यभराच्या आठवणींचा सुखद खजिनाच. 
Mind Map (मुलांचे निरीक्षण)

Mind Map


***


No comments:

Post a Comment

कुल्फी अंकातील रहस्य.

  बबिताने चोरी केली का? 'कुल्फी' हा आमच्या मुलांचा आवडीचा अंक. या अंकाची मुले वाट पाहत असतात. बालकट्टा सेंटरला मुलांना कुल्फी अंक हा...