दहा बाय चौदा आकाराच्या समाज मंदिरामध्ये बालनगरीचं काम गेल्या दोन वर्षापासून अविरतपणे सुरु आहे. विदर्भामध्ये मे महिन्यातील ऊन इतकं असतं कि, समाज मंदिरा मध्ये बसनं सुध्दा कठीण होतं. म्हणून आम्ही सर्वांनी पंचवीस दिवस सुट्टी घेण्याचे ठरवले.
या पंचवीस दिवसात मुलांनी उन्हाळ्यातील लग्न, बेड्यावर (जंगलात पाल) टाकून राहणे ही सगळी कामे केली. पण काही मुले हि गावातच होती.
पंचवीस दिवसांच्या सुट्टी नंतर आम्ही मे महिन्याच्या एक तारखेला येवू असं मुलांना आम्ही आधीच सांगून ठेवलं होतं. त्यामुळे मुलांना हे पक्क माहिती होतं की, आम्ही एक तारखेला येवू.
गावामध्ये लग्न असल्यामुळे लग्नाकडील कुटुंबाकडे पाहुणे आले होते. आणि त्यांच्या घराचेही बांधकाम अपूर्ण असल्यामुळे पाहुण्यांना समाज मंदिरामध्ये आरामाकरिता बालनगरीची मागणी केली. गावातील मंडळीनी 'काही हरकत नाही' असे म्हणून परवानगी दिली. परंतु मुलांना हि गोष्ट काही आवडली नाही. त्यांनी त्या कुटुंबाला चावी देण्यास नकार दिला.
'ती आमची शाळा आहे. त्यातलं काही चोरी गेलं तर?'
'अरे, फक्त आरामाकरिताच हवी आहे रूम.'
'ताई दादा आले तरच आम्ही ती रूम उघडतो. ते आल्या शिवाय आम्ही कुणालाही चावी देणार नाही'.
'तुमचे ताई दादा आता काही येणार नाही, गुमान चावी देवून टाका.
'पण बालनगरीचं काही सामान चोरीला गेलं तर ?'
अरे असे काही होणार नाही. लोकांनी त्यांना गप्प केलं.
गावातील एक व्यक्ती म्हणाला, 'समाज मंदिर सर्वांचे आहे. अडीनडीला ते उपयोगाला आलेच पाहिजे.'
खरंतर यात दोन्ही कडील बाजू तितक्याच महत्वाच्या होत्या आणि मुलं वयानं लहान असल्यामुळे त्यांचं मोठ्यांसमोर फारसं काही चालू शकलं नाही. या सर्व वातावरणामध्ये मुलांना साहित्याची जास्त चिंता वाटायला लागली. शाळा उघडली कि, मुले, माणसे आत येणार आणि साहित्य सगळे मोकळे ठेवले आहे. ते जर चोरीला गेले तर.....?
मुलांचा नाईलाज होता त्यांनी कुटुंबाला चावी दिली व इकडे हर्शल, ओमशंकर, दीपक, मोहन या मुलांनी ठरवले कि, शाळा जर उघडली तर आपण सुद्धा पाहुण्यांच्या सोबत राहायचे. मग काय..मोठ्यांसोबत मुलंही बालनगरीत मुक्कामी राहिली . यासोबतच मनसोक्त संगणकावर चित्रे काढणे, एक्सेल मध्ये वजाबाकी - बेरीज करणे. गाणी ऐकणे ही सगळी कामे मुलांनी केली आणि सोबतच शाळेतील वस्तूवर लक्षही ठेवल्या गेले.
काल इतक्या दिवसानंतर मुलांना भेटल्यावर ही सगळी हकीगत मुलांनी सांगितली. तेव्हा असं लक्षात आलं , मुले लहान आहेत म्हणून पालक त्यांना लहानासारखेच वागवतात. तुला हे जमणार नाही,या गोष्टी तुला समजू शकणार नाही, असाच सूर कायम असतो. परंतु आपण अस न करता, मुलांवर विश्वास टाकत त्यांना मोठ्या सारखं वागवलं, त्यांना झेपेल अश्या जबाबदाऱ्या दिल्या, त्यांचे मनोबल वाढवले, समजू शकेल अशा पद्धतीने मार्गदर्शन केले आणि कोणतीही गोष्ट करतांना त्यातील बारकावे लक्षात आणून दिले तर मूले ले खऱ्या अर्थानी ती आव्हाने आणि कर्त्यव्य पेलू शकतील...
No comments:
Post a Comment