आपल्या वयाची काही वर्षे लोटून गेली की, जुन्या
आठवणी आपल्याला आठवायला लागतात. अगदीच काही वर्षाच्या आतील असेल तर,
त्या अगदी स्पष्ट आठवतात. पण जर फार वर्षापूर्वीच्या जुन्या किंवा बालपणाच्या
असतील तर त्या पुसटश्या स्वरुपात आठवतात. पण आपण नीट निरखून पाहिलं तर सगळ्याच
गोष्टी आपल्याला लक्षात राहिलेल्या नसतात. लक्षात असतात त्या फक्त घटना. आणि ह्याच
घटना म्हणजेच त्यावेळी माणसाने घेतलेला अनुभव.
त्यावेळी काहीतरी ठोस असं झालेलं असेल
म्हणून तो क्षण आपल्या मेंदूत कायमचा टिपून राहिला असेल. यात अनुभवाची यादी हि
व्यक्ती परत्वे नक्कीच वेगवेगळी असू शकते. परंतु आपण सगळ्या घटनांची गोळा बेरीज
केली की, तर आपल्याला असे लक्षात येईल की, ही सगळी यादी
मजा, मस्तीची जास्त प्रमाणात आहेत. जसे एकत्र
खाल्लेला डब्बा, मित्र मैत्रिणींसोबत घालवलेला प्रत्येक क्षण, सहलीत,
शाळेत, कार्यक्रमात केलाला दंगा – खोड्या, सरांनी दिलेला मार, लागलेला
चटका, आई-बाबाने दिलेला मार, आजीने
सांगितलेल्या गोष्टी, केलेले लाड, त्यावेळी मिळालेल्या भेटवस्तू, प्रवासातील
प्रतेक क्षण, जंगलातील मज्जा किंवा खेळलेलो
खेळ, इत्यादी इत्यादी. सगळं कसं अगदी ताज असल्यासारखं वाटतं. नाही का? पण
हेच का बरं लक्षात राहिलं असेल? अभ्यास का लक्षात राहिला नसेल? शिक्षकांनी
तर शिकवला होता ना? मग तो कुठे हरवला?
पाठ्यपुस्तक हे मज्जा म्हणून न शिकवता परीक्षेत
येणाऱ्या उत्तरांसाठीची तयारी म्हणून राहिलं. पाठ करणं आणि घोकंपट्टी करणं त्यात
इतकच होतं. त्यामुळे उत्तरं आले तर शाबासकी, नाही आले तर छडी.
वर्षाखेर अभ्यासक्रम पूर्ण व्हायला हवा या भीतीपोटी मुलांवर झालेल्या कळत-नकळत
शिक्षेमुळे त्यांना अभ्यास मित्र न वाटता शत्रू वाटतो.
आमचे आजी आजोबा तिसरी, चौथी इतकेच शिकेलेले होते. पण ते आम्हाला
त्यांच्या वर्गातील जुन्या कविता, गाणी म्हणून दाखवायचे अगदी
वयाच्या ऐंशीव्या वर्षी. इतकी वर्षे त्यांच्या
शिक्षणाला होऊन सुद्धा ते का बरं विसरले नाहीत?
मुलांनी शाळेत यावं, शिक्षक
शिकवतील ते शिकावं. अगदी निमुटपणे. किमान लिहिता वाचता यावं. या व्यतिरिक्त
मुलांमध्ये शिकण्याची ओढ आणि स्वत:हून वेगेळे कौशल्य असेल तर त्यावर भर देवून
त्यालाच पुढे घेवून जाता येईल अशा पद्धतीची व्यवस्थाप्रणाली जर इथे कार्य करत नसेल
ना, हे आपल्याला तपासून बघायला हवं. मग नेमकं हल्लीच्या शिक्षणातून काय
हरवलंय?
हरवला तो म्हणजे शिकण्यातील आनंद.
कारण, जेव्हा शिकण्यात
आनंद वाटायला लागतो तेव्हा तो माणसाच्या स्मरणात कायमच घर करून बसतो. आपल्या
रोजच्या जगण्यामध्ये लागणाऱ्या कौशल्याचे शिक्षण, प्रत्येक गोष्ट
कशी करून पहायची? त्यात
काय विज्ञान दडलंय हे जाणून घेण्याचे शिक्षण, गटागटात कसे काम
करायचे असते या मूल्यांचे शिक्षण, एकमेकांशी हितसंबध कसे जपायचे, कशा
भावना जपायच्या या आदर भावाचे शिक्षण, स्त्री पुरुष
भेदाभेद यावर उघड चर्चा करून समतेच्या पातळीवरील शिक्षण, जात, धर्म
प्रांत, लिंग, रंग, व्यंग, भाषा, गरीब
- श्रीमंत या भेदाच्या पलीकडील माणूस बनण्यासाठीचे शिक्षण आणि मुख्य म्हणजे
एखाद्या बालकाला लहान मूल न समजता त्याला आजचा वर्तमान आणि भविष्यात तयार होणारा नागरिक म्हणून या सगळ्या
बाबींचा अनुभव देणारं शिक्षण.
कुण्या एका थोर माणसाने म्हटलेलंच आहे
कि, फक्त लिहिता वाचता येणे म्हणजे शिक्षण नव्हे तर बुद्धीला सत्याकडे, भावनेला
माणुसकीकडे आणि शरीराला श्रमाकडे नेण्याचा मार्ग...म्हणजे शिक्षण.
ते लहान आहे. त्याला अजून काय कळतं? हे
वाक्यप्रचार आपल्याला थांबवावे लागणार. कारण आपल्याला लक्षात घ्यायला हव कि, मूल लहान असले तरीसुद्धा त्याच्या
मार्यादानुसार मुलांना उमगतं आणि समजतं असत. मुलं तुमचं, आमचं, सगळ्यांच
निरीक्षण करत असतात. त्यांना हे सुद्धा माहित असत की, आपण लहान आहोत आणि आपल्या
छोट्या हातांनी व उंचीने काहीच, शरीरातील बळाने आपल्याला काहीच करता येणार नाही.
परंतु ते ते आपल्या आजूबाजूचे अनुभव घेवूनच मोठ होत जात आणि हे सगळे अनुभव घेवून
जेव्हा मोठा होतील. वाईट सांगत मिळाली असेल तर तेव्हा मात्र मोठ्या मंडळींनो
आपल्या हातून वेळ निघून गेलेली असेल.
चीन या देशात प्रत्येक नागरिक
एकमेकांचा वाकून आदराने नमस्कार करतात. आपल्या मुलांनाही ते इतरांप्रती आदर कसा
व्यक्त करायचा करायचा ते शिकवतात. त्यांची हि शिकवण कुटुंबांपुरतीच मर्यादित न
ठेवता तो त्यांच्या जगण्याचा भाग बनवून घेतलाय. त्यामुळे आपल्याला प्रत्येक मुलाला
एक सुजाण नगरीक घडवायचे असेल तर आपल्या जगण्यामध्ये मुल्यांची अत्यंत गरज आहे.
आपल्या मुलांना प्रत्येक गोष्टीचे कार्यकारण भाव समजावून सांगणे. त्याला पडलेल्या
प्रत्येक प्रश्नांचे उत्तर देणे. आपल्याला माहित नसेल तर शोधून सांगणे. चूक बरोबर
या नाण्यांच्या दोन्ही बाजू लक्षात आणून देणे. त्याला वेगवेगळ्या चांगल्या
गोष्टीचा अनुभव घेवू देण्याची संधी प्रदान करणे गरजचे वाटते. या सुवर्ण स्वप्नाकारीता आपल्याला बालकेंद्री होणे
गरजेचे आहे. सामाजीकरनातील प्रत्येक घटकामध्ये बालकेंद्री वातारणाची निर्मिती
करायला हवी. समाजातील प्रत्येक नागरिकामध्ये आणि शिक्षणामध्ये आनंद व माणुसकीनेचे
बीज रोवली तर पुढील पिढी हि अधिक समृद्ध होऊ शकेल.
धम्मानंद...
(संचालक) ओवी ट्रस्ट