Saturday, 16 September 2023

'बालनगरीतील निवडणुक'

लोकशाही हा आपल्या देशाचा कणा आहे.  निवडणूक, मतदान ही आपल्या लोकशाहीची मूलभूत आणि अत्यंत महत्वाची प्रक्रिया आहे. वयाच्या अठरा वर्षानंतर आपण देशातील मतदानामध्ये आपली भूमिका बजावत असतो. तोपर्यंत निवडणुकीबदल थोरामोठ्यांकडून वेगवगळ्या पद्धतीच्या गोष्टी ऐकत असतो. मुल सज्ञान होईपर्यंत त्याच्या त्याच्या धारणा ह्या बनलेल्या असतात.परंतु या प्रक्रियेत नेमक चूक आणि बरोबर अशा मूल्यांबाबत सांगणार कुणीही नसतं. मग मुल या वातावरणात आणि व्यक्ती निरीक्षणावरून मुलाची समज हळूहळू दृढ होत जाते पण हि झालेली समज योग्य कि अयोग्य यावर त्यांना सांगण्यास कुणीही नसत. एखादी निवडणूक प्रक्रिया कशी असते? मतदान केल्याने आणि न केल्याने काय होते? निवडणूक आयोगाची कोणती कामे असतात? निवडून येणाऱ्या प्रतिनिधींची कर्तव्ये आणि जबाबदाऱ्या काय असतात? आणि एक सुजाण नागरिक म्हणून या सबंध प्रक्रियेत एक नागरिक म्हणून आपली भूमिका काय? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे जेव्हा मुलं स्वतः अनुभवातून घेतात तेव्हा त्यांच्या आकलन कक्षा आणि शिकण्यातला आनंद हा द्विगुणीत आणि अधिक समृध्द करण्यास प्रेरणा मिळत जाते. आम्ही अशा उपक्रमातून मुलांना या प्रक्रियेचा अनुभव देवून त्यावर सुयोग्य चर्चा करून मुलांची समज विकसित करण्याचा प्रयत्न करू पाहतोय.
आपल्या शिक्षणाचा आपल्या जगण्याची संबंध असायला हवा अस आम्हाला नेहमी वाटत, जीवन जगत असतांना ज्या-ज्या गोष्टीची गरज भासते. किमान त्याचा पूर्वअनुभव मुलांच्या पाठीशी असणे आणि त्यातील वैज्ञानिक कारण माहिती असणे हे अत्यंत गरजेचे आहे. आनंदाने,कृतीतून आणि अनुभवातून शिकणं हे बालनगरीचं मुख्य तत्व आहे. याचाच एक भाग म्हणून नुकतीच पार पडलेली 'बालनगरीतील निवडणुक'. यात सर्व मुलांनी हिरहिरीने सहभाग घेतला. यातून आलेला हा छोटासा अनुभव, निरीक्षण आणि पार पडलेली प्रक्रिया आपल्यासोबत शेअर करायला आम्हाला आनंद होत आहे. 

निवडणुकीतील पहिला आणि दुसरा टप्पा : या टप्यामध्ये साधारणता मुलांना निवडणूक आयोग, मतदान, कर्तव्य आणि जबाबदारी या संदर्भातील प्रश्न देवून त्याची उत्तरे आपल्याच गावातील मंडळीकडून मिळवायला सांगितली, त्यानंतर पुस्तकातून आणि गरज भासल्यास इंटरनेट मोबाईलवर शोधून माहिती संकलित करणे आणि संकलित झालेल्या माहितीला कार्डशीटवर लिहून बालनगरीतील मुलांसमोर सादरीकरण करणे अश्या पद्धतीचे काम नेमून दिले. यात मुलांनी गावातील सरपंच आणि इतर मान्यवर गावकरी यांचेकडून माहिती घेण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर काही नागरिक शास्त्राची पुस्तके चाळली. सोबतच मोबाईलचा वापर करून माहिती गोळा केली. 
गोळा झालेली माहिती ही योग्य आहे की नाही याची चाचपडताळणी सुद्धा करून घेतली. त्यानंतर या माहितीला गटात बसून कार्डशीट वर लिहून काढण्यात आले व दुसऱ्या टप्यात त्याचे सादरीकरण केले. या सादरीकरण मध्ये मुलांनी अतिशय महत्वाचे मुद्दे मांडलेत कि, प्रत्येकाने मतदान करायलाच हवे. आपले मत खूप महत्वपूर्ण आहेत. कारण, मतदान न केल्यास चुकीचा व्यक्ती निवडून येण्याची शक्यता जास्त असते. मत नाही दिले तर आपल्याला प्रश्न विचारण्याचा अधिकार उरत नाही. 

यानंतर मतदानावर
 'माईड मॅपच्या' माध्यमातून चर्चा करण्यात आली. यात शब्दांचे अर्थ आणि प्रक्रियेवर अनुभव शेअर करण्यात आले. यात विशेष म्हणजे निवडणुकीत होणाऱ्या नैतिकतेवर मुलांनी प्रश्न विचारले. जसे कि, निवडणुकीत
लोक पैसे वाटतात, लाच देतात, पार्टी करतात. लोकांना दारू पाजतात? हे चुकीचे आहे ना? असे न करता मतदान होऊ शकते का? कारण यातून आपण स्वतःला विकत असतो आणि मग आपली गावातील विकासाची कामे होत नाही. आपल्याला विचारायला जागा उरत नाही. अशा प्रश्नोत्तराच्या चर्चेतून मुलांनी मोठ्यासांरखी समज दाखवली. एक प्रकारे मुलांना चुकतंय काय ते कळलं पण समाजामध्ये तसे घडतांना दिसत नाही. हा त्यांचा समाजातील लोकांवरतीचा रोश होता.

टप्पा तिसरा आणि चौथा : या टप्यामध्ये ज्या मुलांना निवडणुकीत उमेदवार म्हणून आपला सहभाग घ्यायचा होता
त्यांनी 'बालनगरी निवडणूक आयोगाकडे' आपले अर्ज सादर केले गेले. सोबतच निवडून आल्यानंतर ते कोणते कार्य करणार याची यादी देखील अर्जात त्यांनी नोंद केलेली. यांनतर अर्जाची छाननी करून दहा 
मुलांचे अर्ज मान्य करण्यात आले. मान्य केलेल्या अर्जावर अर्जदारांची मिटिंग करण्यात आली. यात ज्या अर्जदारांचा अर्ज स्वीकारण्यात आलेला नाही. त्यावर चर्चा करून कारणे सांगण्यात आले आणि उर्वरित दहा उमेदवारांची जाहीर सभा घेवून. प्रत्येक उमेदवाराला 'तुम्ही बालनगरीचा सरपंच, उपसरपंच म्हणून
निवडून आलात तर
 कोणती कामे करणार?' यावर प्रत्येकांना आपले मत मांडण्यासाठीची संधी देण्यात आली.काहींनी वर्गातील मुलांना वेळेवर यायला सांगणार, त्यांना नीट बसवणार, अंघोळ करायला, केस विंचरून यायला लावणार, लहान मुलांची काळजी घेणार, बालनगरीची स्वच्छता करणार, जास्तीत जास्त मुले शाळा आणि बालनगरीत यावी यासाठी प्रयत्न करणार हे
सांगितले. हा अनुभव मुलांसाठी आणि आमच्यासाठी अत्यंत सुखद होता. कारण यात असे दिसले कि, प्रत्येक मुलांनी शाळेत जायला हवे यासाठीचा विचार मुलांमध्ये रुजलेला दिसला. भूमिका मांडतांना बालनगरी बद्दलची Ownership  जाणवली सोबतच मुलांनी आपली मते मांडणे हे महत्वाचे होते. यानंतर बैठक  घेवून चिन्हांचे वाटप करण्यात आले आणि प्रचारासाठी पत्रके देवून एका आठवड्याभरात निवडणुकीची तारीख ठरवण्यात आली. यात काही मुलांनी आपण प्रचार कसा करणार आहोत या बद्दलच्या रणनीती ठरवल्या. काहींनी जी मुले बेड्यावर जातात त्यांच्या नातेवाईकांना पटवून त्यांना बालनगरी मध्ये आनण्याचा प्रयत्न करू. मुलींना घरकामात मदत करून त्यांना लवकर बालनगरीमध्ये येण्यास हातभार लावू. मुलांनी गावामध्ये पोस्टर लावून प्रचार-प्रसार करण्यात आला.

टप्पा पाचवा :  एक आठवड्यानंतर निवडणुकीचा दिवस उजाडला.. मुलांना मतदान केंद्रा सारखे वाटावे याकरिता खोल्यांमध्ये फलक आणि टेबल लावण्यात आले. ठरल्याप्रमाणे सर्व उमेदवारांनी जास्तीत जास्त मुलांना मतदान करण्यासाठी बालनगरीच्या मतदान केंद्रात आणले गेले. सर्वांना नीट बसवून मतदान गुप्त पद्धतीने कसे करायचे? याची माहिती देण्यात आली. प्रथम नोंदणी करून, बोटाला शाई लावून आणि मग बॅलेट पेपर वर शिक्का मारून ते मतपेटीत टाकणे. अशी ती प्रक्रिया असणार आहे हे सांगण्यात आले. त्यांतर हि प्रक्रिया मुलांनी मोठ्या उत्साहाने पूर्ण केली. एकीकडे कोण निवडून येणार याची कुजबुज सुरु होती. तर दुसरीकडे काही उमेदवारांच्या मनात धाकधूक होती. एकूण ११० मुलांपैकी ९२ मुलांनी आपला मताधिकार बजावला.
त्यानंतर गावातील सरपंच व गावातील इतर मोठी मंडळी यांनी मतमोजणी करण्यास आनंदाने योगदान दिले आणि मत मोजणीनंतर सगळ्यांसमोर निकाल जाहीर करण्यात आला. ५१ मते घेऊन दीपक सरपंच पदावर तर १७ मते घेऊन मोहन उपसरपंच पदावर निवडून आल्याची घोषणा करताच सर्वांनी आनंदाने जल्लोष केला. टाळ्या वाजवून दोघांचे स्वागत केले. सर्व मुलांनी दोघानाही उचलून घेतलं आणि गुलाल उधळून, औक्षण करून हार घालून, पारंपारिक धनगरी डफ वाजवत गाजवत रॅली काढली. कुटुंबातील मंडळींनी आनंदाने सर्वांना चाॅकलेट, गोळ्या वाटल्या तर गावच्या सरपंचांनी बर्फी आणि चॉकलेट देऊन मुलांच्या आनंदात आपला सहभाग घेतला. आपली मुले सरपंच ,उपसरपंच म्हणून निवडून आल्याचा एक वेगळाच आनंद पालकांच्या चेहऱ्यावर दिसत होता. 

टप्पा सहावा : स्वप्रतिबिंब, मुल्यांकन एकंदरीत झालेली पूर्ण प्रक्रियेवर मुलांशी चर्चा करण्यात आली 
या निवडणुकीमध्ये आपण काय काय केल?  मुले काय शिकली? तेव्हा असे लक्षात आले कि, निवडणूक प्रक्रियेबद्दल मोडकं तोडकं  का असेना  ती सांगत होती. पण शिकवण हि चांगली घेतल्या गेली ती म्हणजे. आपल्याला हवा तसा आणि  योग्य तो माणूस यातून निवडता येतो. दुसरे असे कि, आपले मत आपण कुणाला देतो हे शेवट पर्यंत कुणालाच सांगायचे नाही आणि न दाखवता गुप्त पद्धतीने मतदान करणे या दोन बाबी मुलांना आणि मुलांना सर्वात जास्त आवडल्या. 


*****

कुल्फी अंकातील रहस्य.

  बबिताने चोरी केली का? 'कुल्फी' हा आमच्या मुलांचा आवडीचा अंक. या अंकाची मुले वाट पाहत असतात. बालकट्टा सेंटरला मुलांना कुल्फी अंक हा...